‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यांसारख्या चित्रपटांमुळे अभिनेता विकी कौशल लाखो तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. विकीच्या चित्रपटातील दमदार अभिनयाचीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा सर्वत्र असते. ही चर्चा होण्यामागचे कारणही तसेच आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकी कौशल आणि हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला होता.

मात्र आता विकी कौशल आणि त्याची गर्लफ्रेंड हरलीन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. हरलीनने विकीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना सुरूवात झाली आहे. त्यांच्या ब्रेकअपमागील कारण भूमी पेडणेकर असल्याची चर्चा आहे. याआधी विकी आणि हरलीनचे ब्रेकअप कतरिनामुळे झाल्याचं म्हटलं जात होतं. कारण ‘कॉफी विथ करण ६’ मध्ये कतरिनाने ‘पडद्यावर विकी कौशलसोबत चांगली जोडी जमेल’ असे वक्तव्य केले होते.

विकी कौशल आणि भूमी पेडणेकर हे भानू प्रताप सिंह यांच्या आगामी भयपटात एकत्र काम करणार आहेत. तसेच चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान भूमी आणि विकी एकमेकांजवळ आले असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हरलीनने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असावा असे म्हटले जात आहे.

विकी कौशल लवकरच राकेश शर्मा बायोपिकमध्ये झळकणार आहे. तसेच करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातदेखील तो मुख्य भूमिकेत असणार आहे. करिना कपूर, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर देखील या चित्रपटात दिसणार आहेत.