अभिनेत्यांच्या गर्लफ्रेंड्समुळे मी एक दोन नाही तर तब्बल ३० चित्रपट गमावले असल्याचा सनसनाटी आरोप अभिनेत्री मल्लिका शेरावतने केला आहे. ज्या अभिनेत्यांसोबत मला भूमिका देण्यात आली ते मी ती भूमिका करते आहे हे पचवू शकले नाहीत. त्याचमुळे त्यांनी या गोष्टीत ढवळाढवळ करून मला रिप्लेस करत स्वतःच्या गर्लफ्रेंड्सना त्या भूमिकेत आणलं असंही मल्लिका शेरावतने म्हटलं आहे.
मल्लिकाला घेऊ नका, ती खूप बडबडते. मल्लिका अनेक मतप्रदर्शन करते असं सांगत मला भूमिका नाकारण्यात आल्या असंही मल्लिका शेरावतने म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले आहेत. आता मागे वळून पाहताना मला वाटते की ते लोक मूर्ख आहेत असंही मल्लिकाने म्हटले आहे.
View this post on Instagram
मी जेव्हा सामाजिक बाबतीत मतप्रदर्शन केले तेव्हा माझी मतं कुणीही गांभीर्यानं घेतली नाहीत. आपल्या समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही असंही मल्लिकाने म्हटलं आहे. मी जेव्हा महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा बॉलिवूडमधल्या काही जणांनी मला नावं ठेवली. एवढंच काय काही जणांनी तर मी देशभक्त नाही असंही म्हटलं. मात्र माझं माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे. सध्याचा देशातला काळ हा अभिनेते, कलावंतांसाठी सुवर्णकाळ आहे तुम्ही तुमचं मत अगदी ठामपणे मांडू शकता ही खरोखर चांगली बाब आहे असंही मल्लिकाने म्हटलं आहे.