टी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. त्यामुळे संपूर्ण भारतात दिवाळीपूर्वीच फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये महामुकाबला पाहायला मिळाला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्याने या धावा करताना ४ षटकार आणि ६ चौकारही मारले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही ४० धावांचे योगदान दिले. यामध्ये १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. भारताच्या या विजयामुळे सर्वत्र आनंद पाहायला मिळत आहे. यानंतर विराट कोहलीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेदेखील विराट कोहलीचे कौतुक केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर तिने काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो भारताच्या सेलिब्रेशनचे आहेत. हे फोटो शेअर करत तिने त्याला खास कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तानच्या खिशातून विराटनं खेचून आणला विजय; भारताला दिवाळीची मोठी भेट

अनुष्का शर्मा काय म्हणाली?

फारच सुंदर, अति सुंदर…. दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुम्ही लोकांच्या आयुष्यात आनंद आणला आहात!

तू फारच अद्भुत आहेस. तुझी जिद्द, धमक आणि आत्मविश्वास मनाला खरच भावून जाणारा आहे. मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट सामना आज पाहिला. मी तुझा खेळ पाहून नाचत होती, ओरडत होती…. पण आपली आई असं का करते हे आपली मुलगी पाहात होती. तिला हे समजण्यासाठी ती अजून फार लहान आहे. पण एक दिवस तिला हे नक्कीच समजेल. तिच्या वडिलांनी त्या रात्री सर्वोत्तम खेळी खेळली होती. त्याच्यासाठी तो टप्पा फार कठीण होता. पण आता तो पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि हुशार झाला आहे.

मला तुझा खूप अभिमान आहे. माझे तुझ्यावरील प्रेम असेच कायम अमर्यादित असेल. लव्ह यू, असे अनुष्का शर्माने म्हटले आहे.

दरम्यान भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले. पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली.

आणखी वाचा : IND vs PAK: सचिन तेंडुलकरही कोहलीचा फॅन; खास ट्वीट करत म्हणाला “१९ व्या षटकात तुला बघणं म्हणजे..”

रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र १० चेंडूत १५ धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले. भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुऱ्या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो केवळ २ धावा करून बाद झाला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली याने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याने या धावा करताना ४ षटकार आणि ६ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही ४० धावांचे योगदान दिले. यामध्ये १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही.