Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. पण, तरीही लोकांमधला संताप मात्र कायम आहे. या हल्ल्याची दाहकता अजूनही आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने बरेच पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले. त्यानंतर आता भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

भारताने बुधवारी रात्री पाकिस्तानच्या लोकप्रिय कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घातली आहे. यामध्ये अभिनेत्री माहिरा खान, हानिया आमिर आणि गायक अली जफरसारख्या अशा अनेक पाकिस्तानी कलाकारांचा समावेश आहे. अलीकडेच भारत सरकारने पाकिस्तानच्या १६ युट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कारवाई केली आहे.

हानिया आमिर ही ‘मेरे हमसफर’, ‘कभी मैं कभी तुम’ यांसारख्या पाकिस्तानी ड्रामामुळे भारतात लोकप्रिय आहे. तिने पहलगाम हल्ल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं होतं. तिने लिहिलं होतं, “कुठेही घडलेली कोणतीही शोकांतिका ही सर्वांसाठी एक शोकांतिकाच असते. अलीकडेच्या हल्ल्यामध्ये प्रभावित झालेल्या निष्पाप जीवांबरोबर माझ्या संवेदना आहेत. आपण सर्वजण दुःखात आणि सुखात एकत्र आहोत. जेव्हा निष्पाप लोकांचा जीव जातो तेव्हा त्या वेदना फक्त त्यांच्या नसून आपल्या सर्वांच्या असतात. मला आशा आहे की आपण मानवतेला प्राधान्य देऊ.”

दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या एका दिवसानंतर, भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलली. ज्यात सिंधू पाणी करार निलंबित करणं, अटारी येथील एकमेव कार्यरत जमीन सीमा क्रॉसिंग बंद करणं आणि हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक संबंध कमी करणं यांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं असून तिसऱ्या देशांद्वारे भारताशी होणारा सर्व व्यापार थांबवला आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला पाकिस्तानने नकार दिला आणि म्हटलं की, पाण्याचा प्रवाह रोखण्याचं कोणतंही पाऊल ‘युद्धाला चिथावणी’ देण्याचं कृत्य असल्याचं पाहिलं जाईल.