एकीकडे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. तर दुसरीकडे कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला मात्र चांगलं यश मिळालं. त्याचा ‘भूल भुलैय्या २’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या सुपर सक्सेसनंतर कार्तिक आर्यन सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थात कार्तिक आर्यन याबाबत खुश आहे. सध्या त्याच्याकडे आगामी काळात ४ मोठे चित्रपट आहेत. पण यासोबतच बॉलिवूडमध्ये आउटसायडर असल्याने त्याच्यावर स्वतःचे १०० टक्के प्रयत्न करण्याचा ताणावही आहे.

कार्तिक आर्यनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाला मिळालेलं यश आणि त्यानंतर आलेलं कामाचं प्रेशर यावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत त्याने, ‘जर माझा चित्रपट फ्लॉप झाला असता. तर माझं करिअर संपुष्टात आलं असतं. कारण मला इंडस्ट्रीमधून कोणाचाही पाठिंबा नाही.’ असं वक्तव्य केलं आहे. ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये आउटसायडर असण्यावर त्याने भाष्य केलं. त्यावेळी तो म्हणाला, “मला पाठिंबा देणारं इथे कोणी नाही. त्यामुळे माझा चित्रपट फ्लॉप झाल्यास माझी कोणीच काळजी घेणार नाही.”
आणखी वाचा- रश्मी देसाईशी भांडण ते दारुच्या नशेत ड्रायव्हिंग; सिद्धार्थ शुक्लाचे ‘हे’ वाद होते चर्चेत

कार्तिक आर्यन म्हणाला, “या इंडस्ट्रीमध्ये माझा कोणी गॉडफादर नाही. त्यामुळे मला कोणीच पाठिंबा देणार नाही. मला माहीत नाही की स्टार किड्सना कसं वाटत असेल पण एक आउटसायडर म्हणून मला असं वाटतं की माझा एकही चित्रपट फ्लॉप झाला तर माझं संपूर्ण करिअर संपुष्टात येईल. त्यानंतर कोणीच माझ्यासोबत चांगले प्रोजेक्ट्स करणार नाहीत. मी काहीच करू शकत नाही अशी सर्वांची धारणा होईल.”

आणखी वाचा-कार्तिक आर्यनने नाकारली पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी तब्बल ९ कोटींची ऑफर; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

कार्तिक आर्यन पुढे म्हणाला, “एक आउटसायडर म्हणून फ्लॉप चित्रपट माझ्यासाठी खूप मोठी रिस्क आहे. मला पाठिंबा देणारं किंवा आधार देणारं कोणीच नाही. त्यामुळे आगामी काळात माझ्यावर कामाचं बरंच प्रेशर आहे.” दरम्यान कार्तिक आर्यननं इंजिनियरिंग सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. २०११ मध्ये त्याने ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आगामी काळात त्याच्याकडे ‘शहजादा’, ‘फ्रेडी’ आणि ‘सत्य प्रेम की कथा’ हे चित्रपट आहेत. याशिवाय कबीर खानचा ‘स्ट्रीट फायटर’ आणि हंसल मेहता यांच्या ‘कॅप्टन इंडिया’मध्येही तो दिसणार आहे.