जागतिक भूक निर्देशांकात मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घसरण झाली आहे. जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारत हा १०७ या स्थानावर असल्याचे पाहायला मिळत आहे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि भारताचा छोटा भाऊ मानला जाणारा नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे. यावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. आता या प्रकरणावर सिनेसृष्टीतील कलाकारांकडूनही विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्याचे स्पष्ट मत मांडताना दिसतो. नुकतंच आस्ताद काळेने याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली
आस्ताद काळेची फेसबुक पोस्ट
“Global Hunger Index 2022मधे जे दिसलंय, तेसुद्धा विरोधी पक्षांनी/शत्रू देशांनी/विरोधी मीडियानी बनवून रचून सांगितलंय का?
आणि ते जे दिसलंय, ते खरं असेल(आहेच खरं, पण तरी) तर संबंधित सरकारी यंत्रणा या भिकार कारभाराची जबाबदारी घेणार आहे, काही विधायक हालचाली करणार आहे? की..
परत आपला एक दाढीवाला बाबा येऊन चमत्कारांच्या अद्भुत, अनाकलनीय कथा सांगून, टाळिया-बिळ्या मिळवून, त्या उपाशांच्या तोंडाला थुका लावून, मग आशावादाच्या चार झुळुकांनी त्यांची तोंडं वाळवून, शेवटी त्या तोंडांना “बघा आम्ही कसं तुमचं भलं केलं” या आभासाची पानं पुसणारे?” अशी पोस्ट आस्ताद काळेने केली आहे.
दरम्यान २०२१मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या यादीत भारत १०१व्या स्थानावर होता. हे स्थानदेखील भारतातील भूकेसंदर्भातली गंभीर परिस्थिती विशद करण्यासाठी पुरेसं होतं. मात्र, यावर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन सहा अंकांची घसरण झाली आहे. १२१ देशांमध्ये आता भारत १०७व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९), श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी लागते.
”कन्सर्न वर्ल्डवाईड’ आणि ‘वेल्थ हंगर लाईफ’ या संस्थांकडून संयुक्तपणे दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. संबंधित देशामध्ये उपाशीपोटी राहणाऱ्या लोकांच्या आकडेवारीवरून भूकेची तीव्रता किती आहे, या निकषावर त्या त्या देशांचं मूल्यांकन केलं जातं. त्यानुसार रँकिंग करण्यात येतं. भारताला या निकषांवर २९.१ इतकं रँकिंग मिळाल्यामुळे भारताची यादीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ९.९ पेक्षा कमी गुण असल्यास त्या देशातील परिस्थिती चांगली मानली जाते. हे रँकिंग १० ते १९.९ पर्यंत असल्यास परिस्थिती बरी मानली जाते. २० ते ३४.९ या दरम्यान रँकिंग असल्यास गंभीर, ३५ ते ४९.९ दरम्यान असल्यास चिंताजनक आणि ५०च्यावर रँकिंग असल्यास परिस्थिती भीषण असल्याचं मानलं जातं.