नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे गाजलेलं बालनाट्य. सत्तरच्या दशकात या बालनाट्याने रंगभूमी गाजवली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या नाटकात चिंची चेटकिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर झी प्रस्तुत आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं. यावेळी चतुरस्र अभिनेते वैभव मांगले चिंची चेटकिणीच्या भूमिकेत झळकले. पुन्हा एकदा ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्याने रंगभूमीवर धुमाकूळ घातला. आता या नाटकाचं रुपांतर थ्रीडी चित्रपटात होणार आहे.

हेही वाचा – “एक्स खूप मोठी गटार गंगा…”, चिन्मय मांडलेकरचं स्पष्ट मत; सोशल मीडियावर सक्रिय नसण्याबाबत म्हणाला…

नुकतीच ‘अलबत्या गलबत्या’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच थ्रीडी स्वरुपात रुपेरी पडद्यावर ‘अलबत्या गलबत्या’ पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा वरुण नार्वेकर सांभाळणार असून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

किती गं बाई मी हुश्शार…किती गं बाई मी हुश्शार हा आवाज पुढील वर्षी पुन्हा ऐकू येणार आहे. १ मे २०२५ला ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिंची चेटकिणीच्या भूमिकेत दुसरं तिसरं कोणी नसून अभिनेते वैभव मांगलेचं झळकणार आहेत. या चित्रपटाला अत्याधुनिक व्हीएफेक्सची जोड दिली जाणार आहे. थ्रीडी स्वरुपात हा चित्रपट असल्यामुळे बच्चेकंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे.

हेही वाचा – कंगना रणौत, केदार शिंदेंसह काम करणारा अभिनेता झळकणार स्पृहा जोशीच्या मालिकेत, कोण आहे तो? जाणून घ्या

‘अलबत्या गलबत्या’ या चित्रपटाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि ‘न्यूक्लिअर अ‍ॅरो’चे ओंकार सुषमा माने करत आहेत. ‘भालजी पेंढारकर चित्र’ हे या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.