मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार व दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्तेला ओळखलं जातं. आजवर त्याने विविधांगी गाण्यांची निर्मिती करत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याशिवाय अवधूत एक उत्तम दिग्दर्शक म्हणून देखील नावारुपाला आला. परंतु, त्याने दिग्दर्शित केलेला ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या अपयशातून सावरण्यासाठी नेमकी कोणी मदत केली याबाबत गायकाने ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.

अवधुत म्हणाला, “मी ‘झेंडा’, ‘मोरया’ असे चित्रपट केले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार चालले. सगळीकडे या सिनेमांची चर्चा झाली. सगळ्या गोष्टी छान झाल्या. त्यामुळे मी याच्या दुप्पट बजेट असलेला ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ हा चित्रपट केला. पण, तो चित्रपट सपशेल आपटला. तो आघात माझ्यासाठी खूप मोठा होता.”

हेही वाचा : गुलाबी साडी, पुणेरी थाट अन्…; ‘कन्यादान’ फेम अभिनेता झाला मुंबईचा जावई, अमृता-शुभंकरचं थाटात पार पडलं लग्न

“ज्यावेळी लोक आपल्याला बोलतात त्यावेळी ते दोन्ही बाजूंनी बोलतात. पण, ज्यावेळी तुम्ही केलेल्या कलाकृतीविषयी कोणीही बोलत नाही. ते गाणं किंवा तो चित्रपट दुर्लक्षित होतो त्यावेळी मनात असं वाटतं अरे लोकांनी दखल न घेण्याइतपत हे छोटं होतं का? यामुळे माझ्यावर खूप परिणाम झाला. तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे जातो.” असं अवधुतने सांगितलं.

अवधुतला या कठीण प्रसंगातून बाहेर येण्यासाठी एका मराठी बॉलीवूड दिग्दर्शकाने पाठिंबा दिला होता. याविषयी सांगताना गायक म्हणाला, “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांमुळे मी यातून बाहेर आलो. चित्रपट बनवल्यावर मी त्यांना सारखे फोन करून एकदा तरी बघा ना अशी विनंती करत होतो. पण, त्यांना काही कारणास्तव वेळ नव्हता. त्यानंतर चित्रपट पडला हे त्यांच्या कानावर जाताच त्यांनी मला फोन केला. ते स्वत: चित्रपट पाहायला आले. मी त्यांना भेटलो…चित्रपट चालू झाला. १०.३० वाजता चित्रपट संपला त्यानंतर आम्ही गप्पा मारायला लागलो ते पहाटे ३ वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो.”

हेही वाचा : अभिनेते पंकज त्रिपाठींच्या भावोजींचा रस्ते अपघातात मृत्यू, बहिणीची प्रकृती गंभीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आशुतोष गोवारीकरांनी मला घडल्याप्रकाराचा मतितार्थ सांगितला ते म्हणाले होते, अवधुत जर तू इथे थांबलास तर आयुष्यात पुन्हा कधीच तू दिग्दर्शन करू शकणार नाहीस. त्यामुळे उद्या सकाळी तुझ्याकडे जो कोणी निर्माता येईल किंवा तुझ्याकडे जी काही स्क्रिप्ट येईल आता एक महिन्याच्या आत तू स्वत:ला नव्याने सिद्ध करायचं. यानंतर लगेच मी ‘एक तारा’ चित्रपट केला, ‘कान्हा’ बनवला. आता अलीकडेच प्रदर्शित झालेल्या Boyz मालिकेतील एकूण चार चित्रपटांची निर्मिती केली. एकंदर त्यांच्या म्हणण्यानुसार मी न थांबता लगेच कामाला सुरुवात केली होती” असं अवधूतने सांगितलं.