२०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात पंढरपूरमधील चिमुकल्यांच्या एलिझाबेथ या सायकल भोवती फिरणारी कथा पाहायला मिळाली होती. या चित्रपटात श्रीरंग महाजन, सायली भांडाकवठेकर, पुष्कर लोणकर, नंदिता धुरी यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. त्यामुळे अजूनही या कलाकारांनी साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून आहेत.

‘एलिझाबेथ एकादशी’मधील एक सीन खूप गाजला होता. ज्यामध्ये झेंडू बांगड्या विकताना पाहायला मिळाली होती. यावेळी गिऱ्हाईकांना आपल्या दुकानाकडे वळवण्यासाठी तिची आणि चहावाल्याची झालेली जुगलबंदी अजूनही प्रेक्षकांना खूप आवडते. ‘बांगड्या गरम, बांगड्या गरम…गरम बांगड्या, गरम बांगड्या’ हा झेंडूचा डायलॉग अजूनही प्रेक्षकांना खूप हसवतो. या सीनचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण हा सीन करताना किती रिटेक घ्यावे लागले? हे तुम्हाला माहितीये का?

‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटात मुक्ता उर्फ झेंडूची भूमिका साकारणारी सायली भांडाकवठेकरने नुकताच ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी तिने ‘बांगड्या गरम, बांगड्या गरम…’ सीन मागची गोष्ट सांगितली.

सायली भांडाकवठेकर म्हणाली, “बिहांडी द सीन असं काही नाहीये. तो डायलॉग लिहूनचं आला होता. कायतरी घडलं आणि मग तो डायलॉग लिहिला, असं काही नाही झालं. आजूबाजूचं ते वातावरण, मग त्या आजीने विचारणं, बांगड्या गरम कशा? हे सगळं जुळून आलं. त्यामुळे हे लोकांना युनिक वाटलं, बांगड्या कशा काय गरम असू शकतात. त्यात मी इतक्या आत्मविश्वासाने तो डायलॉग म्हणतेय.”

“मला परेश सरांनी सांगितलं होतं, थोडं मिश्किलपणे डायलॉग घ्यायचा आहे, त्यामुळे थोडा आत्मविश्वास हवाय. हे असंच असतं, बांगड्या गरम असतातच. एवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे. कारण आपल्याला गिऱ्हाईकांचं तुमच्या दुकानाकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ‘बांगड्या गरम, बांगड्या गरम’ म्हणं. ते ऐकून दोन बायका आल्यादेखील, हे काय विकतेय विचारतं?” असं सायलीने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे सायली भांडाकवठेकर म्हणाली, “या सीनसाठी १० ते १२ रिटेक झाले असतील. त्या दोन वाक्यांसाठी फक्त. कारण ते परफेक्ट येणं तितिकंच महत्त्वाचं होतं. विशेष म्हणजे त्या चहावाल्यांबरोबर सगळं जुळवून आणणं. ते चहावाले रिटेकमुळे थकले होते. पण, त्यांनी ज्या पद्धतीने वाक्य घेतली ते पण खूप महत्त्वाचं होतं. चहावाला आणि झेंडूची केमिस्ट्री खूप छान वाटली.”