नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांतून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाबरोबरच त्यांचे परखड विचार हे नेहमी चर्चेचा विषय असतात. मनोरंजनसृष्टीत त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यांना बरेच लोक घाबरतात. यामागचं कारण शरद पोंक्षे यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये अभिनेते शरद पोंक्षे सहभागी झाले होते. त्या वेळेस त्यांना भार्गवीने विचारले, “मी तुमच्याबरोबर काम केले असल्यामुळे मला असं वाटत नाही. पण, मनोरंजनसृष्टीत तुमची एक वेगळीच प्रतिमा आहे. असं का?” त्यावर शरद पोंक्षे म्हणाले, “माझ्या ज्या भूमिका लोकप्रिय झाल्या, त्या खलनायकाच्या भूमिका होत्या. महत्त्वाची भूमिका म्हणजे नथुराम गोडसे. एक अत्यंत कट्टर राष्ट्रभक्त, कडक विचारवंत; ज्यांनी गांधीजींना गोळ्या मारल्या त्यांची भूमिका मी केली. ती २० वर्षं केली. म्हणजे एक-दोन वर्ष नाही किंवा १०० वगैरे प्रयोग झाले आणि ते बंद पडलेत, असेही नाही. १९९८ ते २०१८ एवढ्या प्रदीर्घ काळात त्या नाटकाचे ११०० प्रयोग केले. त्यात खूप राडे झाले. या खलनायकांच्या भूमिकांबरोबर मी त्याच्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा पोहोचवण्याची जी व्याख्यानं देतो. त्या सगळ्यांमुळे माझी अशी प्रतिमा तयार झाली आहे.”

हेही वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनंतर सिद्धार्थ-मिताली होणार आई-बाबा? अभिनेत्रीच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

हेही वाचा – आदित्य रॉय कपूरला विमानतळावर लक्षात आलं पॅन्टचं बटण खुलं राहिलंय अन्…; व्हिडीओ झाला व्हायरल

पुढे पोंक्षे म्हणाले, “दुसरी गोष्ट माझी सुरुवातीपासून खूप निर्माते, काही दिग्दर्शक, काही प्रॉडक्शन मॅनेजर यांच्याशी खूप राडे घालून भांडणं वगैरे झाली आहेत. खूप तमाशे मी केले आहेत. कारण- मला खोटं अजिबात सहन होत नाही. खोट बोललेलंही सहन होतं नाही आणि मी अशा इंडस्ट्रीत आहे; जिथे सगळे लोक खोटं बोलतात. म्हणजे कुणाचेही खरे चेहरे दिसतच नाहीत. सध्या मुखवटे घातलेली माणसं असतात. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये; पण कारण नसताना उगाचच खोटं बोलतात. त्यामुळे माझी सटकते आणि मी राडे घालतो, भांडतो, असं सगळं होतं. त्यामुळे माझी अशी एक खूप मोठी प्रतिमा तयार झाली आहे. मला खूप घाबरतात. नवनवीन कलाकार तर खूपच घाबरतात.”

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची १०० कोटींकडे घोडदौड; ३० दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यात माझा आवाजही भयंकर आहे. कुणी सर म्हणालं आणि मी त्याला काय आहे? असं बोललो तरी ते ऐकून समोरचा पुढे बोलतच नाही. कधी कधी जो सीन करण्यासाठी बोलवायला आलेला असतो, तो परत जातो आणि सर ओरडले म्हणून सांगतो. मग मी समजावतो की, मी ओरडलो नाही. मी विचारलं फक्त काय आहे? अशा प्रकारे लोक घाबरतात. मी हे काही मुद्दाम करत नाही. माझा आवाजच तसा आहे, तर काय करू? अशा सर्व गोष्टींमुळे माझी एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. मी खूप स्ट्रेअर करून बघतो म्हणजे आरपार बघतो. माझ्या पापण्यासुद्धा इतरांपेक्षा कमी मिटतात. त्याच्यामुळेही मला लोक घाबरतात. पण, जेव्हा ते माझ्याबरोबर काम करतात तेव्हा त्यांना हळूहळू कळायला लागतं नाही यार, हा माणूस फारच वेगळा आहे,” असं शरद पोंक्षे म्हणाले.