रुपेरी पडद्यावरची ग्लॅमरस आई म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा लागू. त्यांनी ७०-८० च्या दशकात सिनेसृष्टीत पदार्पण केले. हिंदी चित्रपटसृष्टीत वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाच्या पडद्यावरच्या ‘आई’ची भूमिका त्यांनी रंगवली. मात्र १८ मे २०१७ रोजी रिमा लागू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी नुकतंच रिमा लागू यांची एक आठवण सांगितली.
सुहास जोशी यांनी नुकतंच सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात रिमा लागू यांच्या आठवणींबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी मला तिला एक गोष्ट देता आली नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी त्या भावूक झाल्या.
आणखी वाचा : “२ तास वेळ काढून…” ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावची पोस्ट, म्हणाली “९० चा काळ…”
“मला अगदी शेवट शेवटची गोष्ट आठवतेय. स्वाती, शेखर ढवळेकर, रीमा हे सगळे इथे राहायला आले होते. भरपूर गप्पा झाल्या. त्यावेळी काय नवीन करू वैगरे याबद्दलही चर्चा झाली. बहुतेक वेळेला ते फसलेले प्रयत्न असतात, पण गप्पा खूप होतात. मग ते सर्वजण इथे राहिले.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी रिमा म्हणाली की मला ज्वारीची उकड पाहिजे. मी करते म्हटलं, पण त्याच दिवशी नेमकं ज्वारीचं पीठ घरात नव्हतं. त्यामुळे मग मी तिला म्हणाले, मी तुला ज्वारीची उकड करुन देईन, पण त्यासाठी तुला घरी परत यावं लागेल. त्यावेळी ती मला म्हणाली की, मी त्याबद्दल सर्वांकडून खूप ऐकलंय. पण कधीही खाल्ली नाही. त्यानंतर जे काही झालं, आमची भेट झाली नाही आणि ती गेली. त्यादिवशी मला खूप रडू आलं, कारण तिने ज्वारीची उकड मागितली होती आणि मला तिला ते खायला घालता आलं नाही.
ते माझ्या मनाला अजून लागून राहिलं. मी अजूनही कधी ज्वारीची उकड केली की, तरी रिमा तुझ्यासाठी असं म्हणून मी ते खायला सुरुवात करते”, असा किस्सा सुहास जोशी यांनी सांगितला.
आणखी वाचा : चोर बाजारातील खरेदीपासून ते छत्रपती शिवरायांच्या भूमिकेपर्यंत…; वाचा शरद केळकरचा संघर्षमय प्रवास
दरम्यान रिमा लागू यांनी ‘कलयुग’ या हिंदी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. हिंदी चित्रपटात त्यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या. पण त्यांच्या या भूमिका चांगल्याच गाजल्या. ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष बुलंद’ ही त्यांची नाटक विशेष गाजली. बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणून रिमा लागू यांना ओळखले जायचे.