अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अभिनयाव्यतिरिक्त व्याख्यानंही देत असतात. त्या व्याख्यानाचे व्हिडीओ ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असतात. नुकसाच एक व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यात ते देशाची प्रगती आणि बहुसंख्यांकांचा अपमान या विषयावर बोलताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात, "ज्या देशामध्ये बहुसंख्यांकांचा अपमान होतो, ते राष्ट्र कधीच मोठं होतं नाही, त्या देशाची कधीच प्रगती होत नाही, तेच बरोबर या देशाचं झालंय. बहुसंख्यांकांचा सातत्याने अपमान करणारे कायदे निर्माण झाले. आमच्या राजकारण्यांनी सतत स्वतःच्या स्वार्थासाठी अहिंदूंना खूश ठेवलं आणि ते आता इतके डोक्यावर येऊन बसले आहेत. कारण काय तर आम्ही एक नाही. हिंदू एक नाही, हिंदू वज्रमुठीसारखा नाही. आम्ही अठरा पगड जातीत विभागले गेलेले आहोत, याच्यासारखं दुर्दैव नाही. हे संपतच नाही कधी, वाढतच चाललंय. मग समाज बनले, एकेक समाज. त्यानंतर समाजा-समाजाला खूश करणं सुरू झालं. हे असलं घाणेरडं राजकारण सुरू झालं. या सगळ्यामध्ये हे कुणाच्याही लक्षातच आलं नाही की आपली हिंदुंची शक्ती विभागली जातीये. आणि आम्ही आमच्या या विभागलेल्या शक्तीचा बरोबर समोरचे दुसरे लोक फायदा घेत आहेत," असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत. दरम्यान, यापूर्वी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्वातंत्र्यानंतर भारतात महापुरूष जन्मणे बंद झाले, असं ते म्हणाले होते.