गेल्या कित्येक वर्षांपासून उषा नाडकर्णी प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसंच मराठीसह हिंदीतही उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. अलीकडेच त्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कुकिंग शोमध्ये पाहायला मिळाल्या. नुकतंच त्या भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अभिनय करत उषा नाडकर्णी ‘या’ ठिकाणी करायच्या नोकरी
उषा नाडकर्णी म्हणाल्या, “२ मार्च १९६५ला मी बीएमसीत कामाला लागली. २४ जानेवारी १९७५ला बीएमसीतलं काम सोडलं. नऊ वर्षे १० महिने मी बीएमसीत काम केलं. त्यानंतर ३० जानेवारी १९७५मध्ये देना बँकमध्ये कामाला लागली आणि २ फेब्रुवारी २००१ मध्ये ते काम सोडलं, ज्याला २५ वर्षे झाली आहेत. तेव्हा अभिनय क्षेत्रातही काम करत होते. जर मला दुपारी प्रयोगासाठी जायचं असेल तर मी डबा घेऊन जात नव्हती. कारण डबा खाण्यात माझी १५ मिनिटं जाणार म्हणून. मराठी नाटकाचे प्रयोग सकाळी, दुपार, रात्री असायचे.’
पुढे उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मला लहानपणापासून नृत्य, अभिनयाची आवड आहे. पप्पांना अभिनय करण्याबाबत काहीही समस्या नव्हती. पण, आईला अजिबात आवडत नव्हतं. ती शिक्षिका होती आणि ती एक आई म्हणून बरोबर होती. मुलीचं लग्न होणार आहे, लोक काहीही बोलतात आणि नाटक क्षेत्रात काम करायचं झालं तर वेळा ठरलेल्या नसतात. कधीही येतात आणि कधीही जातात. एकेदिवशी माझ्या आईने माझे सगळे कपडे घराबाहेर फेकले. बोलली, ‘नाटक करायचं असेल तर आमच्या घरातून निघून जा.’ मी पण खूप रागीट होते. मी सगळे कपडे उचलले. आम्ही ग्रँड रोडला राहत होतो. तर मी पूर्वेला गेले, बॅग खरेदी केली. मग बाहेर फेकलेले कपडे भरले आणि माझी मैत्रीण होती, जी माझ्याबरोबर बीएमसीत काम करत होती, तिच्या घरी गेले. दुसरीकडे पप्पा ऑफिसमध्ये मला शोधायला आले होते.”
उषा नाडकर्णी घरी कधी परतल्या?
नंतर हर्षनं विचारलं, “तेव्हा तुम्ही किती वर्षांच्या होता?” त्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या की, माझं तेव्हा लग्नही झालं नव्हतं. १८-१९ वर्षांची असेल. मी सात दिवसांनंतर घरी परतले. तेव्हा पप्पा ज्योतिषांकडे गेले आणि त्यांनीही सांगितलं होतं, ती आठवड्याभरात घरी परत येईल. त्यावेळेस माझे भाऊ-बहीण घरी परत येण्यासाठी सतत ऑफिसमध्ये येत असायचे. पण मी म्हणायचे, तुम्ही जा. आईला मी नकोय ना. तर तुम्ही जा. मात्र जेव्हा मला पारितोषिक मिळायची तेव्हा आमचं सगळं कुटुंब एकत्र असायचं. त्यावेळीच त्यांना कळायचं, ही काम करतेय. काही लफडी वगैरे नाहीयेत. त्यामुळे माझ्याबाबतीत सकारात्मक झाले आणि राग सोडून दिला.”