अलका कुबल या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामधील बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्यांनी सोशीक सुनेच्या किंवा मुलीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या या सर्व भूमिकांचं प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसलं. पण, त्या खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचल्या त्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटातून. त्यामध्येही त्यांनी लक्ष्मी नावाच्या साध्या भोळ्या मुलीची भूमिका साकारली होती.
पडद्यावर अलका कुबल या त्यांच्या कुटुंबीयांचा जाच सहन करणाऱ्या, सोशीक, भोळ्या मुलीच्या किंवा सुनेच्या भूमिका साकारत असल्या तरी खऱ्या आयुष्यामध्ये मात्र त्या बिनधास्त, बेधडक स्वभावाच्या आहेत. याबाबत त्यांनी नुकत्याच ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. या मुलाखतीमध्ये अलका कुबल यांनी त्यांच्या व्यावसायिक, तसेच खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे.
‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत अलका यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दलही सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांना त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी “लग्नापूर्वी समीर व मी अनेकदा एकत्र फिरायचो आणि तेव्हा माझे घरचे लग्न कर म्हणत माझ्याकडे लग्नासाठी आग्रह धरत होते. परंतु, समीर लग्नाबद्दल काही बोलतच नसे आणि मग शेवटी मीच त्याला समीर आपण नुसते फिरत आहोत. लग्नाचं काय आपण लग्न करूयात आता, असं म्हटलं. त्यावर त्यानं हो करूयात, असं उत्तर दिलं.”
अलका कुबल व समीर आठल्ये यांनी १९९२ साली एकमेकांशी लग्नगाठ बांधली. तर अलका कुबल यांचे पती देखील याच इंडस्ट्रीत काम करीत होते.अलका व समीर यांना इशानी आठल्ये व कस्तुरी आठल्ये अशा दोन मुली आहेत. एक पायलट आहे; तर त्यांची दुसरी मुलगी डॉक्टर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुलाखतीमध्ये पुढे त्यांना त्यांच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रापासून लांब असल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी “माझ्या मुलींना या क्षेत्रात फार रस नव्हता आणि मीही त्यांना यासाठी फार पाठिंबा दिला नाही. कारण- या क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली आहे. तुमचे प्रोजेक्ट चालले, तर तुम्हाला लोक ओळखतील; नाही, तर शेवटपर्यंत तुम्हाला स्ट्रगल करावे लागते.”