रेश्मा राईकवार
मराठीत भयपट निर्मितीचा फारसा प्रयत्न केला जात नाही, हे खरे आहे. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके भयपट अलीकडच्या काळात पाहायला मिळाले आहेत. अनेकदा आपल्या भयपटात वा थरारपटातही विनोदाचा नको तो आणि नको तितका तडका देण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळय़ाला फाटा देत पूर्णपणे भयपटांच्या जातकुळीशी प्रामाणिक राहात एक चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी या तरुण दिग्दर्शकद्वयीने ‘व्हिक्टोरिया : एक रहस्य’च्या माध्यमातून केला आहे. विराजस आणि जीत दोघांचाही हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असूनही भयपटाचं तंत्र आणि दिग्दर्शकीय मांडणीत कुठेही नवखेपणा जाणवत नाही हे विशेष. सिद्धार्थ आणि अंकिता हे तरुण विवाहित जोडपं सुट्टीसाठी म्हणून स्कॉटलंडला येतात. सिध्दार्थचा दूरचा काका अधिराजचा इथे स्कॉटलंडमध्ये खूप मोठा व्हिला आहे. एकेकाळी तिथे हॉटेल होतं, मात्र सध्या हा व्हिला रिकामीच आहे. सिद्धार्थ आणि अंकिता व्हिलामध्ये येतात खरे.. मात्र तिथे पाऊल ठेवल्यापासून अंकिताला काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात. भास होऊ लागतात. यात भरीस भर म्हणजे अधिराजचे विचित्र वागणे या दोघांनाही कोडय़ात पाडते. अधिराजव्यक्तिरिक्त या वाडय़ात कोणी आहे का? अधिराज आपल्यापासून काही लपवतो आहे का? हे सुरुवातीपासून येत जाणारे संशय, सिद्धार्थ आणि अंकिताच्या नात्यात असलेला एक विचित्र ताण आणि अधिराजचा संशयी भूतकाळ या सगळय़ातून भयभुताची वीण अधिकाधिक घट्ट होत जाते, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे. ओंकार गोखले याने लिहिलेल्या भयकथेसाठी योग्य अशी जागा आणि इन मीन तीन कलाकार या एवढय़ा बळावर विराजस आणि जीत यांनी चित्रपटाची मांडणी केली आहे. बाकीच्या व्यक्तिरेखा काही क्षणापुरती येतात. त्यामुळे संपूर्ण चित्रपट सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग या तिघांच्या अभिनयावर आणि दिग्दर्शकीय मांडणीवर उभा आहे. त्यात कुठेही अन्य नाटय़ाचा वा मनोरंजनासाठी आवश्यक मसाला असा कोणताही आधार दिग्दर्शकांना घ्यावासा वाटलेला नाही यासाठी त्यांचे कौतुक आहे.
स्कॉटलंडपासून दूर गावात असलेल्या, काहीशा गूढ वास्तूची त्यांनी केलेली निवड इथे सार्थ ठरली आहे. या वास्तूची एकूण रचना, तेथील जुन्या पद्धतीची रंगीत पेंटिंग्ज, जुन्या पद्धतीच्या गॉथिक शैलीतील रचना, जुनी शिल्प अशा सगळय़ाच गोष्टींचा पुरेपूर आणि प्रतीकात्मक वापर चित्रपटात करण्यात आला आहे. या भयकथेत ही वास्तूही जणू एक पात्र असावी अशा पद्धतीने कथा इथे आकाराला येत जाते. निर्मिती हिंदीतील प्रसिद्ध निर्माते आनंद पंडित यांची असल्याने चित्रपटाची निर्मितीमूल्यंही चांगली आहेत, मात्र कुठेही अवास्तव खर्च वा भव्यपणाचा सोसही केलेला जाणवत नाही. तोच विचार व्हीएफएक्सच्या बाबतीतही केलेला जाणवतो. काहीतरी भूत दिसावं म्हणून वाटेल तसं व्हीएफएक्स वापरून गोष्टी घडवण्यात आलेल्या नाहीत. आवश्यक तितकाच वापर केलेला असल्याने ते कुठेही खटकत नाही. त्याउलट भयपटासाठी आवश्यक अशा पार्श्वसंगीताचा वापर, वर म्हटल्याप्रमाणे वास्तूत उपलब्ध असलेला प्रकाश आणि त्या परिसरातील नैसर्गिक प्रकाश याचा उत्तम वापर करून घेण्यात आला आहे. फार काही हाताशी नसताना, कुठलाही आक्रस्ताळपेणा करण्यासाठी वाव नसताना सोनाली, आशय आणि पुष्कर या तिघांनीही सहज अभिनयाच्या जोरावर या तिन्ही व्यक्तिरेखा अस्सल रंगवल्या आहेत. चित्रपटाची पूर्वार्धातील गती काहीशी संथ आहे, मात्र एका वळणानंतर आणि अर्थात मध्यंतरानंतर चित्रपट चांगलाच वेग घेतो. एकूणच मांडणीतही फार धावाधाव केली नसल्याने आपल्याला परिचित अशा भयपटांच्या मांडणीपेक्षा तो काहीसा संथ वाटू शकतो, मात्र तरीही त्यातील रहस्याबाबत प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरण्यात विराजस आणि जीत यांना यश आले आहे. कुठेच काही खटकणार नाही इतका उत्तम भयपट नाही, मात्र त्याच्या जवळ जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न ‘व्हिक्टोरिया’च्या माध्यमातून या दोन्ही नवोदित दिग्दर्शकांनी केला आहे. मांडणीच्या बाबतीत मराठीतला हा नवा आणि तरुण प्रयोग म्हणून ‘व्हिक्टोरिया’ पाहायला हवा.
व्हिक्टोरिया
दिग्दर्शक – जीत अशोक, विराजस कुलकर्णी कलाकार – सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, पुष्कर जोग.