यंदाच्या ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेला एकमेव भारतीय चित्रपट म्हणून दिबाकर बॅनर्जी आणि आदित्य चोप्रा यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘तितली’ चर्चेत आहे. ‘कान’ला निघण्यापूर्वी ‘तितली’मागचा उद्देश आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात झालेल्या निवडीबद्दल दिबाकर बॅनर्जी, दिग्दर्शक कानू बेहल यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. खरेतर, ‘तितली’ची पटकथा इतकी जबरदस्त होती की त्याचे दिग्दर्शन करण्याचा मोह आवरत नव्हता. पण, कानू दिग्दर्शक असल्याने त्याला मी दिग्दर्शन करू का?, असे विचारण्याचा बेशरमपणा शक्य नव्हता. म्हणूनच निर्मात्याच्या या भूमिकेतून ‘तितली’शी बांधला गेलो, अशी कबुली दिबाकरने दिली.
‘कान’ महोत्सवातील ‘अनसर्टन रिगार्ड’ विभागात ‘तितली’ची निवड झाली असून जगभरातील अन्य १८ चित्रपट या विभागात आहेत. ‘तितली’ हा भारतीय चित्रपट आहे. तो बॉलिवूडपट नाही. त्यामुळे आम्ही तिथे बॉलिवूडचे प्रतिनिधीत्व करणार नाही, असेही दिबाकरने आवर्जून सांगितले. ‘कान’ महोत्सवात ‘तितली’ची योग्य ती प्रसिध्दी करून नंतर विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तितली’ दाखवला जाईल अशा पध्दतीने नियोजन करण्यात येत असल्याचे दिबाकरने सांगितले. या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी गुनीत मोंगा यांनी घेतली आहे.
दिल्लीतील दोन भावांच्या आयुष्यावर ‘तितली’ची कथा गुंफण्यात आली आहे. त्यातला एक भाऊ आपल्या त्रासदायक कुटुंबापासून पळ काढतो. मात्र, त्याची अखेर गुन्हेगारी मार्गावरच होते, अशी या चित्रपटाची कथा आहे. ही कथाच इतकी जबरदस्त होती की त्याचे दिग्दर्शन मीच करावे, असे वाटत होते. ते शक्य नव्हते पण, निर्माता म्हणून या चित्रपटाची प्रत्येक गोष्ट आपण पूर्ण करावी या हेतूनेच ‘तितली’ची जबाबदारी घेतली. मात्र, या चित्रपटादरम्यान दिग्दर्शक कानू बेहल आणि सहपटकथा लेखक शरत कटारिया यांच्याशी झालेली चर्चा ही माझ्या ‘ब्योमकेश बक्शी’ चित्रपटासाठीही तितकीच उपयुक्त ठरली, असे सांगणाऱ्या दिबाकरने ‘तितली’ हा आपल्यासाठी सर्जनशील अनुभव होता, अशी मनमोकळी कबुली दिली. या चित्रपटात रणवीर शौरी, अमित सियाल, ललित बेहल यांच्याबरोबरच नवोदित अभिनेता शशांक अरोरा यांच्या भूमिका आहेत.