सैराटच्या घवघवीत यशानंतर नागराज मंजुळे या नावाने थेट बॉलिवूडलासुद्धा भुरळ घातली होती. करण जोहरने सैराटचा हिंदी रिमेक केला. तिथूनच खरंतर नागराजच्या हिंदीतल्या प्रवासाला सुरुवात झाली. मध्यंतरी त्याने ‘झुंड’ चित्रपट काढला होता. या चित्रपटात खुद्द अमिताभ बच्चन यांना घेऊन आपल्या समाजव्यवस्थेचे एक वेगळेच चित्र प्रेक्षकांसमोर मांडले होते. नागराज हा त्याच्या बेधडक स्वभाव आणि वक्तव्यासाठी जास्त चर्चेत असतो. तो कधी चित्रपटाच्या माध्यमातून, कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कधी कवितेच्या माध्यमातून नेहमीच समाजातल्या गडद बाजूवर लिहीत असतो. नागराज प्रथम स्वतःला कविच म्हणवून घेणं पसंत करतो. कविता हे त्याचं पहिलं प्रेम आहे हे त्याने स्वतः कबूल केलं आहे. त्याच्या कित्येक कविता प्रचंड गाजल्या आहेत.

नुकतंच नागराजने कवितेसंदर्भातच एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे ती चांगलीच व्हायरल झाली आहे. आपल्या एका मित्राचा कवितासंग्रह आपण प्रकाशित करत असल्याची बातमी नागराजने या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. विक्रांत नामक एका तरुणाकडून त्याने संग्राम बापू हजारे या तरुणाने केलेल्या कविता ऐकल्या होत्या. त्या कविता नागराजला खूप भावल्या. त्या कुठेही प्रकाशित केलेल्या नसल्याने आपल्या प्रोडक्शनच्या माध्यमातून नागराजने त्याच्या कवितांचा एक संग्रह प्रकाशित करण्याचं ठरवलं आहे.

आणखीन वाचा : धाकड गर्ल ‘कंगना’ आता फिल्मफेअर सोहळ्याच्या विरोधात? कोर्टात करणार केस

याबद्दलच नागराजने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करून माहिती दिली आहे. कविता या विषयाच्या बाबतीत अजूनही नागराजला अत्यंत जिव्हाळा आहे. चांगल्या कवितांमुळेच आपलं आयुष्य समृद्ध झालं आहे असं नागराजचं म्हणणं आहे.

नागराज पुढे म्हणतो, “कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. एखादी चांगली कविता वाचली की खूप समृद्ध झाल्यागत वाटतं. काही वर्षांपूर्वी विक्रांतच्या तोंडून संग्रामच्या कविता ऐकल्या आणि भारावून गेलो.नंतर कळलं की संग्रामनं एकही कविता कधी कुठं प्रकाशित केली नाही. अलुफ ,आत्ममग्न संग्रामनं त्याची कविता मित्रांच्या मैफिलीबाहेर कुठं जाऊच दिली नाही. संग्रामनं जणू आपल्याच गाळलेल्या जागा भरल्या आहेत. ह्या रिकाम्या पोकळीत आपल्यागतच आणखी एक जीव ह्या रिक्ततेचा अर्थ लावत बसला आहे हे जाणून जरासं दुकटं वाटलं…संग्रामच्या कविता मला प्रचंड आवडल्या. वाटलं ह्या कवितांची अनुभूती आनंद सगळ्यांना घेता यावा म्हणूनच आटपाटच्या माध्यमातून ‘रिकामटेकड्याचे आत्मवृत्त’ हा संग्राम बापू हजारे या मित्राचा पहिला संग्रह प्रकाशित करतोय…आशा आहे तुम्हाला आवडेल.भेटू सांगलीत….२७ ऑगस्ट संध्याकाळी ४ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागराज हा भारतीय चित्रपटसृष्टीतला एक धाडसी दिग्दर्शक आहे. ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ किंवा ‘झुंड’सारख्या चित्रपटातून तो सामाजिक विषय फार संवेदनशीलतेने हाताळतो. याबरोबरच तो एक उत्तम कविदेखील आहे.