मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन दिला आहे. २४ दिवसानंतर मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी जाणार हे स्पष्ट झाले. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आर्यनला जामीन मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेता आर माधवनने आर्यनला जामीन मिळाल्यानंतर ट्वीट केले आहे. 

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.

“देवाचे आभार. एक बाप म्हणून मी खूप समाधानी आहे. सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडू दे”, असे ट्वीट आर माधवनने केले आहे. दरम्यान, न्यायालयाने आर्यनला जामीन दिला असला तरी तो आजच तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अंतिम निर्णय होईल. यानंतरच आर्यन तुरुंगाबाहेर येऊ शकेल.

आर्यन खानसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”

“क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक, मग केवळ आर्यन आणि अरबाजचा संबंध कसा?”

“क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक हजर होते. असं असताना एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचं सांगितलंय. हा षडयंत्राचा आरोप योगायोग नाही, तर कटाचा भाग आहे. जहाजावर कुणाच्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत त्यामुळे याला षडयंत्र म्हणता येणार नाही. हे सर्व एकत्र भेटणार आहेत, तेथे त्यांना ड्रग्ज मिळणार आहे आणि मग ते ड्रग्जचं सेवन करणार आहेत अशी चर्चा नाही. त्यामुळेच हा कट आहे,” असं मत रोहतगी यांनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जहाजावर कोणत्याही भेटीगाठी नाही, त्यामुळे षडयंत्र म्हणता येणार नाही”

“जर एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये लोक आहेत. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं तर ते सर्व लोक षडयंत्राचा भाग आहेत असं म्हणता येईल का? या प्रकरणात षडयंत्र म्हणावं असा कोणताही पुरावा नाही. आर्यन केवळ अरबाजला ओळखत होता. याशिवाय इतर कुणालाही ओळखत नाही. तेथे सर्वांची भेट झाली हे सिद्ध करणं कठीण आहे. मात्र, वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी बैठक किंवा भेट होणं गरजेचं आहे. तिथं जाणीवपूर्वक ६ ग्रॅम ड्रग्ज सोबत बाळगलं असू शकतं. त्याचा षडयंत्राशी काहीही संबंध नाही.” असंही मुकुल रोहतगी यांनी नमूद केलं.