बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काही आठवड्यांपूर्वीच आलियाने गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षांव झाला होता. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून आलिया भट्ट जुळ्या मुलांची आई होणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या सर्व चर्चांवर रणबीर कपूरनं अशी काही प्रतिक्रिया दिली की, त्याचे चाहतेही गोंधळात पडले आहेत.
रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. २२ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरनं दोन सत्य आणि एका खोट्या गोष्टींबद्दल सांगितलं ज्यामुळे आलिया भट्ट जुळ्या मुलांची आई होणार आहे अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. या मुलाखतीत रणबीर म्हणाला होता, “माझी जुळी मुलं आहेत. मी एका पौराणिक चित्रपटात दिसणार आहे. आणि मी कामातून मोठा ब्रेक घेणार आहे.” रणबीरच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर आलिया- रणबीर जुळ्या मुलांचे आई-बाबा होणार अशी चर्चा रंगली.
आणखी वाचा- लग्नाआधीच गरोदर होती आलिया भट्ट? करण जोहरकडून चुकून झाला मोठा खुलासा
आता ‘पिंकव्हिला’नं दिलेल्या वृत्तानुसार रणबीरनं नुकत्याच दिल्ली येथे दिलेल्या एका मुलाखतीत प्रमोशनच्या वेळी पसरलेल्या जुळ्या मुलांच्या अफवांवर भाष्य केलं. यावर रणबीर म्हणाला, “यावरून अफवा पसरण्याचं कारण नाही. मला दोन सत्य आणि एक खोटी गोष्ट विचारण्यात आली होती. ते मी सांगितलं, पण आता मी हे सांगू शकत नाही की, यात सत्य काय होतं आणि खोटं काय होतं.”
रणबीर कपूरच्या या वक्तव्यानंतर आता त्याचे चाहते देखील गोंधळले आहेत. कारण अभिनेत्याच्या तीन वक्तव्यांपैकी जुळ्या मुलांबाबत केलेलं वक्तव्य खरं आहे असा चाहत्यांचा अंदाज आहे. रणबीरकडे आगामी काळात ‘एनिमल’ आणि इतर बरेच चित्रपट आहेत त्यामुळे कामातून मोठा ब्रेक घेणं तर त्याला शक्यच नाही. तसेच तो ‘ब्रह्मास्त्र’ या पौराणिक चित्रपटामध्ये दिसणार आहे हे त्यानं सांगितलेलं दुसरं सत्य आहे असा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत.