गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका ‘रात्रीस खेळ चाले ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतर असल्याचे पाहायला मिळते. पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच तिसऱ्याही पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कारण दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत.
नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून सुरु झालेली मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्यापर्यंत येऊन पाहोचली आहे. माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबणार नाहीत. तिची पुण्याई तिच्यासोबत असली तरी हवी एक अशी व्यक्ती जी या दुष्ट शक्तीवर अंकुश ठेवेल. कोण असेल ही व्यक्ती? असा अंदाज बांधत असाल तर ही व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे. आणि हे तुमचं लाडकं पात्र आहे. हो ती परत येतेय.. ‘वच्छी परत येतेय’.
आणखी वाचा : ‘रात्रीस खेळ चाले ३’मधील अभिरामची पत्नी आहे तरी कोण?
वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार? खरच माईच्या पाठीशी उभी राहणार का? शोभा, काशीच्या मृत्यूचा सूड घेणार का? तुमच्या मनातल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन ‘वच्छी परत येतेय.’ मालिकेतील आगामी भागात प्रेक्षकांना वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मिळेल.