मकरंद माने या तरुण दिग्दर्शकाचा प्रवास

‘रिंगण’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे जाहीर झाल्यानंतर काय बोलू आणि काय नको.. अशी मकरंदची अवस्था झाली होती. ‘विठ्ठलच पावला’ असे म्हणणाऱ्या मकरंद मानेसाठी पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नासाठी मिळालेला हा पुरस्कार लाखमोलाचा आहे हे निश्चित. महिन्याभरापूर्वी ‘रिंगण’ विविध चित्रपट महोत्सवांमधून फिरत होता त्या वेळी त्याच्या प्रदर्शनाविषयी बोलताना संकोचणारा मकरंद राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर या चित्रपटाच्या वाटचालीविषयी आश्वस्त झाला आहे. अकलूज ते ‘रिंगण’ पर्यंतचा प्रवास मकरंदने  ‘लोकसत्ता’कडे उलगडला.

अकलूजमध्ये शिकत असताना केवळ आईवडिलांच्या हट्टाखातर मकरंदने इंटेरिअर डिझायिनगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला जे आवडते आहे त्या क्षेत्रात काही प्रयत्न केले तरच यश मिळेल, अशी धारणा असलेल्या मकरंद माने या तरुणाने चित्रपट क्षेत्रात जाण्यासाठी घरातून पळून जाऊन मुंबई मायानगरी गाठली होती. मात्र घरच्यांनी पकडले आणि पुन्हा अकलूजला परतावे लागले. या वेळी माझ्या हट्टासाठी का होईना घरच्यांनी परवानगी दिली आणि पुण्यात ललित कला केंद्रात नाटय़ प्रशिक्षणासाठी दाखल झालो. इथून खऱ्या प्रवासाला सुरुवात झाल्याचे मकरंदने सांगितले. समर नखाते, प्रवीण भोळेंसारख्यांचे मार्गदर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर नाटक की चित्रपट अशा दोन वाटा होत्या. मात्र आíथक गणित जुळवण्यासाठी नाटकाचा विचार सोडून मुंबईत येऊन मालिका करू लागलो, असे त्याने सांगितले. त्याच वेळी दिग्दर्शक राजीव पाटील यांच्याशी झालेली ओळख त्याच्या आयुष्याची दिशा बदलवणारी ठरली.

सिनेमा काय असतो, आशयात्मक सिनेमा, त्याची तांत्रिक अंगे या सगळ्या गोष्टींचे बाळकडू राजीव पाटील यांच्याकडून मिळाल्याचे त्याने सांगितले.‘रिंगण’ या चित्रपटात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होता. जे आजूबाजूला बघितले होते त्यावरच प्रामाणिकपणे चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला राष्ट्रीय पुरस्काराची दाद मिळाल्याने खूप आनंद झाला आहे, असे त्याने सांगितले. राष्ट्रीय पुरस्कार मिळावा हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र पुरस्कारासाठी म्हणून आपण चित्रपट करत नाही. या पुरस्कारानंतर आता अधिक बारकाईने चित्रपट करण्याची जबाबदारी वाढली आहे, असेही मकरंदने सांगितले.