अभिनेते सचिन खेडेकर यांचे प्रतिपादन
अभिनय, दिग्दर्शन व चित्रपटाच्या सर्वच अंगाने ज्ञान हे चित्रपट महोत्सवासारख्या उपक्रमातून मिळत असते. उत्तमोत्तम चित्रपट पाहिल्यानंतर एक प्रगल्भ प्रेक्षकही तयार होऊ शकतो. यासाठी चित्रपट महोत्सवाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी येथे केले. आपण शास्त्रोक्त अभिनयाचे शिक्षण घेतलेले नसून चित्रपट महोत्सव, अभिनयाचा सराव आणि सवरेत्कृष्ट दिग्दर्शक, लेखकांच्या संस्कारामुळे घडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील प्रोझोन मॉलमधील आयनॉक्स चित्रपटगृहात नाथ ग्रुपच्या वतीने आयोजित चौथ्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते शुक्रवारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ दिग्दर्शक व चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, संयोजक नंदकिशोर कागलीवाल, प्रोझोन मॉलचे मोहम्मद अर्शद, ज्येष्ठ लेखक डॉ. अजित दळवी, उल्हास गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खेडकर म्हणाले, चित्रपट महोत्सव हे प्रेक्षकांना कलात्मकतेतील वेगळेपण देणारा उपक्रम आहे. आज चित्रपट माध्यमातील अनेक नवनवीन प्रयोगांची माहिती, ज्ञान प्रेक्षकांना मिळण्याची गरज आहे. त्याची पूर्ती प्रेक्षकांना झाली तर प्रगल्भ असा प्रेक्षक तयार होऊ शकतो. चित्रपट माध्यमातील रसग्रहण करणाऱ्या प्रेक्षकांची सध्या गरज आहे. अलीकडे भरणाऱ्या चित्रपट महोत्सवांमुळे मराठी प्रेक्षकांची अभिरुची विशिष्ट उंचीवर पोहोचली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट हा बदलत जाणाऱ्या जगाला मांडण्याचे एक माध्यम असल्याचे सांगितले. सुरुवातीला मुंबई, पुण्यापर्यंत मर्यादित असणारे चित्रपट महोत्सव आता मागील काही वर्षांपासून औरंगाबादेतही आयोजित होत आहेत. नुकताच नागपूरलाही चित्रपट महोत्सव भरविण्यात आला होता. यापुढे सोलापूरलाही चित्रपट महोत्सव भरविण्यात येणर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. पटेल यांनी दिवंगत अभिनेते ओमपुरी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
तुर्की येथील रउफ या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. विविध लघुपट येथे पुढील तीन दिवसात व जगभरातील विविध भाषांमधील २९ चित्रपट येथे दाखविण्यात येणार असल्याचे अनुया दळवी यांनी सांगितले. यावेळी तीन सवरेत्कृष्ट लघुपट बनविणारे अनुक्रमे किरण चव्हाण (याकुब), योगीसिंग ठाकूर(संतुलन) व सुरज खरात यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास श्रीकांत, उमरीकर, लक्ष्मीकांत धोंड, समीर नखाते आदी उपस्थित होते.