Aadesh Bandekar : ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून ‘दार उघड बये दार उघड’, असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. ते आता निर्मात्याची भूमिकाही पार पाडत आहेत. आज या क्षेत्रात इतके यशस्वी असलेले आदेश बांदेकर एकेकाळी मात्र खूप नैराश्यात होते. त्याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
दहावीत असताना कमी टक्के मिळाल्याने आदेश बांदेकर यांना खूप नैराश्य आलं होतं. त्या नैराश्यातून त्यांच्या मनात आत्महत्येसारखा गंभीर विचारही आला होता. मात्र, या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना वडिलांनी अनोख्या प्रकारे मदत केली होती. त्याबद्दल स्वत: आदेश बांदेकर यांनी आठवण व्यक्त केली आहे.
‘राजश्री मराठी’शी साधलेल्या संवादात आदेश बांदेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील नैराश्याच्या काळाबद्दल सांगितलं. यावेळी ते असं म्हणाले, “मला दहावीला ३७ टक्के मिळाले होते. तेव्हा मला नैराश्य आलं होतं. तेव्हा मी घरी जाणार नाही, त्यापेक्षा आपण कुठेतरी जाऊयात आणि आपण आत्महत्याच करूया… असे खूप विचित्र विचार डोक्यात येत होते.”
आदेश बांदेकर इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे ते म्हणाले, “इतके कमी टक्के आहेत; तर आता घरी कसं जायचं हेच माझ्या डोक्यात येत होतं. पण, तेव्हा याबद्दल माझ्या वडिलांनी मला अनोख्या पद्धतीनं शिकवण दिली आणि मला आपोआप अभ्यासाची गोडी निर्माण झाली. आज वडिलांच्या डोळ्यांत माझ्याविषयी अभिमान आणि आनंद दिसतो. पण जर तेव्हा मी नैराश्यामुळे काही चूक केली असती, तर मी आज माझं उत्तम आयुष्य घालवून बसलो असतो.”
कमी टक्के मिळाल्यामुळे वडिलांनी दिलेल्या अनोख्या शिकवणीबद्दल आदेश बांदेकर म्हणाले, “कमी मार्क्समुळे घरी जायची इच्छा नव्हती; पण तेव्हा वडिलांनी पेढे आणले आणि ते पॅक करून बिल्डिंगमधल्या सगळ्या घरांत वाटण्यासाठी सांगितलं. तेव्हा मी प्रत्येक घरात जाऊन ते पेढे दिले. यामागे त्यांचा हेतू असा होता की, कमी गुण असूनही आपण परिस्थितीला धैर्यानं सामोरं जावं.”
दरम्यान, आदेश बांदेकर यांनी अलीकडेच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर ‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आषाढी वारीच्या निमित्तानं त्यांनी पंढरपूरच्या वारीचा अनुभव प्रेक्षकांसमोर मांडला. यावेळी अनेक वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभवदेखील शेअर केले.