मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजुक होती. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

कलाविश्वातील कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही विक्रम गोखले यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धाजंली वाहिली आहे. अश्विनीने नटसम्राट चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रपटातील नाना पाटेकर व विक्रम गोखले यांच्यातील संवादाचा हा व्हिडीओ आहे. “हे नटपण आहे ना हे पेशीत जाऊन असं घुसतं, साचतं. नट विस्मरणात जातो पण त्याने साकारलेल्या भूमिका चिरंतर राहतात”, असे विक्रम गोखलेंचे चित्रपटातील संवाद आहेत.

हेही वाचा >> विक्रम गोखले यांना अमिताभ बच्चन यांच्यामुळे मिळालं मुंबईत घर, स्वत:च सांगितलेला किस्सा

अश्विनीने या व्हिडीओला “विक्रम गोखले सर तुम्ही व तुमच्या भुमिका कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली” , असं कॅप्शन दिलं आहे. विक्रम गोखले यांच्या जाण्याने कलाविश्वात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विक्रम गोखले यांनी अभिनयाबरोबरच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं होतं. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.