पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला प्रतीउत्तर देत मिशन सिंदूर अंतर्गत त्यांच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला, त्यामुळे सध्या एकूणच देशभरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर १० मार्च रोजी भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धाला पूर्णविराम देण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली. परंतु, यानंतर अवघ्या काही क्षणातच पाकिस्ताननं पुन्हा भारतावर ड्रोन सोडल्याचं वृत्त पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर देशभरातून अनेकांनी या घटनेचा निषेध करत राग व्यक्त केला. यासह काही कलाकार मंडळींनीदेखील सोशल मीडियामार्फत याबाबत संताप व्यक्त केला.
अशातच छोट्या पडद्यावरील अभिनेता अली गोनीनंदेखील या संदर्भात ट्विट केलं होतं. अली गोनी हा सध्या भारताबाहेर असून त्याचे कुटुंबीय भारतात असल्याने त्याने ते भयानक परिस्थितीमधून जात असल्याचं म्हटलं आहे. यासह त्याने घडलेल्या घटनेबाबत सोशल मीडियामार्फत भाष्य केलं आहे.
अलीने, “उर्दूमध्ये लिहून पाठवा त्यांना इंग्रजी समजलं नसेल ते निरक्षर सैन्य आहे.” असं ट्विट करत पाकिस्तानच्या सैन्याला टोला लगावला होता. परंतु, यानंतर मात्र अनेकांनी त्याला ट्रोल केलं. ट्रोलिंगला प्रतिउत्तर देत त्यानं, “लोकांना मला त्रास द्यायचा आहे, पण मला याचा काही फरक पडणार नाही. मला माझ्या देशासाठी, कुटुंबीयांसाठी शांतता हवी आहे, एवढंच माझं म्हणणं आहे आणि त्यात काही बदल होणार नाही,” असं म्हणत पुन्हा ट्विट केलं.
यासह अली गोनीनं त्याच्या कुटुंबियांबरोबरचा फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं तो भारताबाहेर असून त्याचं सपूर्ण कुटुंब जम्मूमध्ये असल्याचं सांगितलं. तर तिथे त्यांच्या परिसरात ड्रोन हल्ले होत असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. पुढे अलीनं म्हटलं, ”परंतु, तरीसुद्धा काही लोक मात्र त्यांच्या घरात निवांत बसून सोशल मीडियामार्फत पोस्टिंग करत आहेत. पण, जे बॉर्डरजवळच्या परिसरात राहतात त्यांच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. आपल्या सैन्याचा, आय.व्ही.एफ. जवानांचा मी आभारी आहे,” असं त्याने म्हटलं आहे.