Amey Khopkar : कित्येक वर्षांपूर्वीच ‘बॉम्बे’ हे अधिकृत नाव बदलून ‘मुंबई’ (Mumbai) करण्यात आलं आहे. तरीसुद्धा टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अजूनही ‘बॉम्बे’ असाच उल्लेख केला जात आहे. आता याचप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

काय आहे अमेय खोपकर यांची पोस्ट?

बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंतीवजा इशारा देण्यात येत आहे.

बॉम्बे असा उल्लेख केला जाणं आम्हाला मान्य नाही-खोपकर

कपिल शर्मा यांचा ‘द कपिल शर्मा शो’ हा देशभरात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा केला जातो यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. झी 24 शी बोलताना अमेय खोपकर म्हणाले, “कपिल शर्मा शो असो किंवा हिंदी सिनेमांत असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर असो मुंबईचा उल्लेख जाणूनबुजून ‘बॉम्बे’ असा केला जातो. चेन्नई किंवा बंगळुरू बोलताना मात्र नीट नाव घेतले जाते. हे आम्हाला मान्य नाही.” मनसेने कपिल शर्मा शोच्या टीमला पत्र दिले आहे आणि आता ट्विटरवरही इशारा दिला आहे. जर बदल झाला नाही तर शोच्या शूटिंग स्पॉटवर जाऊन आंदोलन करणार आणि शूटिंग बंद पाडणार, अशी धमकी खोपकर यांनी दिली.

आम्ही कपिलला टपिल म्हणू का?

मुंबईचे नाव ‘बॉम्बे’ वरून ‘मुंबई’ असे बदलले गेले. पण बॉलिवूड चित्रपटांमध्ये अजूनही ‘बॉम्बे’ हा शब्द सर्रास वापरला जातो, असा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे. त्यांनी कपिल शर्माला देखील धारेवर धरलं. ते म्हणाले, “15 ते 17 वर्षांपासून कपिल शर्मा मुंबईत राहतो तरी त्याला शहराचे नाव नीट घेता येत नाही का? बाहेरून आलेल्या लोकांना मुंबईत काम मिळते पण शहराचे नाव चुकीचे घेतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. उद्या आम्ही कपिलला ‘टपिल’ म्हणू तर ते चालेल का? मनसेचा कपिल शर्मा किंवा बॉलिवूडला विरोध नाही, पण शहराच्या नावाचा आदर करावा. “