Chala Hawa Yeu Dya New Season : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा नवीन सीझन २६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास १० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर या कार्यक्रमाने मार्च २०२४ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
मात्र, ‘चला हवा येऊ द्या’च्या यंदाच्या सीझनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलंय. यंदा शोमध्ये पाच गँगलीडर्स असतील आणि त्यांच्या टीममध्ये महाराष्ट्रभरातून सहभागी झालेले विनोदवीर असतील. याशिवाय यंदा आणखी एक मोठा बदल शोमध्ये झालेला आहे तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’चा सूत्रसंचालक बदलण्यात आला आहे. डॉ. निलेश साबळेने १० वर्षे या कार्यक्रमाची धुरा सांभाळली होती. पण, यंदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने निलेश साबळे या शोचा भाग नसेल.
डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे यंदाच्या पर्वात सहभागी झालेले नाहीत. त्यांच्याऐवजी शोमध्ये गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव आणि सूत्रसंचालक म्हणून अभिजीत खांडकेकरची वर्णी लागली आहे. २६ आणि २७ जुलैला ‘चला हवा येऊ द्या’चं नवीन पर्व टेलिव्हिजनवर ऑन एअर करण्यात आलं. यानंतर ‘झी मराठी’ वाहिनीने प्रेक्षकांचं मत जाणून घेण्यासाठी तुम्हाला एपिसोड कसा वाटला अशी पोस्ट शेअर केली होती. यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहे. बहुतांश नेटकऱ्यांनी भाऊ कदम आणि निलेश साबळेशिवाय शोमध्ये मजा नाही अशा कमेंट्स केल्या आहेत.
प्रेक्षकांच्या कमेंट्स
‘झी मराठी’ने केलेल्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करत म्हणतात, “निलेश साबळेचा चेहरा खूप बोलका आहे त्याचा आत्मविश्वास कमाल होता…त्याला मिस करतोय”, “काहीच मजा नाही आली”, “डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडे नसल्यामुळे काहीच मजा येत नाही”, “कॉमेडी शो वाटत नाही यापेक्षा दुसरं काही पाहिलं तर मजा येईल”, “भाऊ कदम तरी पाहिजे होता”, “भाऊ आणि निलेशशिवाय हा शो पाहणं कठीण आहे”, “म्हणावं तशी काहीच मजा आली नाही मिसिंग भाऊ आणि निलेश” अशा असंख्य प्रतिक्रिया युजर्सनी या पोस्टवर केल्या आहेत.


दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ हा शो शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा यामध्ये श्रेया बुगडे, गौरव मोरे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव हे कलाकार झळकताना दिसतील.