अभिनेता शशांक केतकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या तो मुरांबा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकतंच शशांक केतकरने होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी याबद्दल एक पोस्ट शेअर करत मराठी वाहिन्यांवर संताप व्यक्त केला आहे.
अनेक मराठी मालिकांमध्ये विविध सण साजरे केले जातात. दिवाळीपासून ते पाडव्यापर्यंत सर्व सण साजरे करत मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न मराठी मालिकांमध्ये विशेषत: केला जातो. आता सर्व मालिकांमध्ये होळीची धामधुम सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये मोठ्या उत्साहात होळी आणि धुळवड साजरी केली जाते. पण सध्या काही ठिकाणी होळीच्याच दिवशी धुळवड खेळली जाते. अनेक हिंदी मालिकांमध्ये हा प्रकार घडताना दिसतो.
आणखी वाचा : “तू डोक्यावरून फिरवलेला हात…” शशांक केतकरची पोस्ट चर्चेत
पण आता याच हिंदी मालिकांच्या अनुकरण मराठी मालिका आणि वाहिन्या सर्रास करताना दिसत आहे. या प्रकरणावरच लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने आवाज उठवला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत मराठी वाहिन्यांना चांगलाच धडा दिला आहे. शशांकने नुकतंच इन्स्टाग्रामवर कालनिर्णय या कॅलेंडरचा फोटो पोस्ट केला आहे. यात त्याने ६, ७ आणि १२ मार्च या तीन तारखांना गोल केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्याने वाहिन्यांच्या निर्मात्यांना होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण वेगवेगळे असतात याची जाणीव करून दिली आहे.
“हे तीन वेगळे सण असतात !!!!! कृपा करुन रंगपंचमीला होळी म्हणू नका. आम्ही मराठी परंपरा जपतो असं म्हणणाऱ्या सर्व वाहिन्या, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्वांसाठी. आपण हिंदी च अनुकरण budget मध्ये करतो का??? नाही ना … मग चुकांमध्ये तरी कशाला”, अशी पोस्ट लिहित शशांक केतकरने वाहिन्यांना चपराक लगावली आहे.
आणखी वाचा : “आयुष्यातील सर्वात कठीण काळ…” तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत
त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या या पोस्टला दुजोरा दिला आहे. तसेच अनेक कलाकार त्याच्या या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहे. तसेच त्याच्या या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं जात आहे.