Shashank Ketkar Share Video : मराठी अभिनेता शशांक केतकर हा कायमच त्याच्या सोशल मीडियाद्वारे सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट मतं मांडताना दिसतो. खराब रस्ते, कचरा, खड्डे, सिग्नल, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांबद्दल तो अनेकदा व्हिडीओद्वारे तक्रार शेअर करीत असतो. त्याच्या या तक्रारींची अनेकदा दखलही घेतली जाते. अशातच त्याचा नवा व्हिडीओ चर्चेत आहे.
शशांकनं पुन्हा एकदा कचऱ्याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि याद्वारे त्यानं त्यावर तोडगा, तसेच भारत स्वच्छ व्हावा या मोहिमेसाठी सर्वांना आवाहनही केलं आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला शशांक म्हणतो, “अनेक जणांना वाटत असेल ना… शशांक कशाला खड्ड्याचे, रस्त्याचे, कचऱ्याचे, नियम न पाळणाऱ्यांचे फोटो वा व्हिडीओ शेअर करतोस?त्यानं काही होणार नाही रे… तुझ्या या प्रयत्नांनी जर भारत सुधारला, तर आणखी काय पाहिजे… असं बऱ्याच जणांचं मत आहे, मला माहीत आहे की, जवळची मंडळी, नातेवाईक, काही शत्रू, असे बरेच जण मला हसतात. पण मला हसणारे, माझी निंदा करणारे किंवा मला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना एकच सांगायचंय, मी जे करतोय, ते तुम्हा सगळ्यांच्या मनात असतं; पण तुमच्या मनात फक्त भीती आणि उदासीनता आहे.”
पुढे तो म्हणतो, “तुमच्या मनाला समाधान मिळावं आणि आपण काहीतरी केलं या विचारानं शांत झोप लागावी, असं वाटत असेल तर या व्हिडीओकडे जरा गांभीर्यानं बघा… तुम्हालासुद्धा असं जर काही करता आलं, तर नक्की करा. कारण- आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनीच आपला भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र होईल. बघा असाच एक अनुभव…”
त्यानंतर शशांक ठाण्यातील पोखरण रोड-२ वरील कचऱ्याचा व्हिडीओ दाखवतो. अभिनेत्यानं १० ते १५ ऑगस्ट असे सलग पाच दिवस या रस्त्यावरील कचऱ्याची परिस्थिती दाखवली आहे. रात्रीच्या वेळेस त्यानं रस्त्यावरील कचऱ्याची परिस्थिती दाखविणारे व्हिडीओ शेअर केले आहेत.
त्यानंतर शशांक १५ ऑगस्ट या दिवसाची परिस्थिती दाखवतो आणि म्हणतो, “आज १५ ऑगस्ट… काहीच बदललेलं नाहीय. मी गेले पाच दिवस व्हिडीओ करत आहे. पण, येथील कचऱ्याची ही अवस्था मागचे अनेक महिने, अनेक वर्षांपासूनची आहे. मी या कचऱ्यासाठी व्हिडीओ करीत असेन, असं वाटत असेल, तर तसं नाही. मी हा व्हिडीओ मानसिकतेसाठी करत आहे. याच कचऱ्याच्या बाजूला दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत एक महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी उभी असते. त्या सहा तासांतला कचरा गोळा करून, ती गाडी जाते. पण, उर्वरित तासांमध्ये कचरा जमतो, वाढत जातो व पुन्हा सकाळीसुद्धा कचरा उचलला जातो.”
पुढे शशांक सांगतो, “आजूबाजूला कष्टकरी समाज, मोठमोठे टॉवर्स आणि बरीच रेस्टॉरंट्स आहेत, ज्याचा कचरा या ठिकाणी अधिकृत-अनधिकृतपणे टाकला जातो. या कचऱ्याच्या ५०० मीटर उजवीकडे-डावीकडे दहीहंड्यांचा सराव सुरू आहे. गणपतीचे कारखानेसुद्धा आहेत. इथे इतकं छान, पवित्र घडत असताना त्याचं वातावरण अशुद्ध, घाण असणं पटतं का? माझी विनंती आहे की, ज्या वेळेत इथे कचरा गोळा करणारी गाडी उभी असते, त्याऐवजी या कचऱ्याचं कायमस्वरूपी नियोजन करणं आवश्यक आहे.”
पुढे तो असं म्हणतो, “खरंतर मी या परिसरात राहत नाही, इथून दीड किलोमीटर लांब राहतो. या कचऱ्याचा तसा मला थेट त्रास होत नाही, पण छोट्या छोट्या ठिकाणचा कचरा आणि ‘भारतात हे होत राहतं’ ही मानसिकता बदलली पाहिजे. छोट्या-छोट्या ठिकाणी जर लक्ष दिलं गेलं तरच भारत स्वच्छ होईल आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र साजरं होईल. भारतातील अनेक मुद्द्यांवर बोलू शकतो, आपल्या तक्रारी मांडू शकतो. तसंच भारतावर प्रेमही करू शकतो. तर मी माझ्या आवडीचे त्या विषयावर भाष्य करतो. आपण तरुण पिढीने यावर लक्ष देऊयात.
नंतर तो आवाहन करत म्हणतो, “या परिसरात दहीहंडी, गणेशोत्सव मंडळं आहेत, त्यांनी आणि स्थानिक राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त सण साजरे न करता, त्याचा व्यवसाय न करता, त्या आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा याची जाणीवही असली पाहिजे. जेव्हा हे होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं सण साजरे होतील. भारत स्वतंत्र होईल. त्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळालंय, असं म्हणणं चुकीचं ठरेल. महानगरपालिकेनं येथे चांगल्या व सुस्थितीतल्या कचऱ्याच्या पेट्या ठेवाव्यात आणि नागरिकांनी त्यात कचरा टाकावा. आपण सगळे मिळून हातभार लावूयात आणि आपला भारत स्वच्छ करूयात…”
तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शशांकनं म्हटलंय, “स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारत आणखी एक वर्षानं मोठा झाला. म्हणजे हा भारताचा वाढदिवस! येणारं पुढील वर्ष भारतासाठी स्वच्छ आणि आनंददायी जावो हीच प्रार्थना. माझ्या अशा छोट्या छोट्या प्रयत्नांतून भारत स्वच्छ होईल का? मला माहीत नाही; पण निदान माझा परिसर तरी स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. फक्त एकदा हे सगळ्यांनी ठरवलं की, भारत स्वच्छ झालाच…”
त्यानंतर तो लिहितो, “आता कृपा करून, हा पक्ष… तो पक्ष या गप्पा मारू नका.. त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. जे सत्तेत आहेत आणि जे आधी होते, दोन्ही वेळेला अस्वच्छता ही भारताची ओळख राहिलेलीच आहे. आम्हा सामान्य नागरिकांना स्वच्छ परिसर मिळावा, शुद्ध हवा मिळावी… या काही अवाजवी अपेक्षा नाहीत. भारत उत्तम प्रगती करतोय यात वाद नाही. स्वच्छ भारत मोहीमसुद्धा कौतुकास्पद आहे; पण…” दरम्यान, त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.