प्रत्येक कलाकाराच्या संघर्षाची गोष्ट असते. परिस्थितीशी दोन हात करत प्रत्येकजण पुढे आलेला असतो. कलाकार म्हटलं की संघर्षाला पर्याय नसतो. परंतु, या कठीण काळात प्रत्येक जण समजून घेईलच असं नसतं. अशातच आता ‘नवरी मिळे हिटलरला’फेम अभिनेता प्रसाद लिमयेनेदेखील त्याचा संघर्षकाळ सांगितला आहे.
‘मराठी मनोरंजन विश्व’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी मुंबईत नवीन असताना इथे राहण्याकरता घर शोधत होतो. तेव्हा घर मिळत नसल्याने मी बाबांना फोन केला आणि म्हणालो, बाबा आता काय करू? त्यावर ते म्हणाले, तू रस्त्यावर राहा. मला माझ्या मित्रांनी काही विचारलं तर मी सांगेन प्रसाद मुंबईला गेला आहे, जॉब करतोय. घर नाही आहे तो रस्त्यावर राहतोय, पण तू कुठल्याही नातेवाईकाच्या घरी राहू नकोस. कोणाच्याही ओळखीने, कोणाचाही डोक्यावर हात घेऊन मुंबईत राहू नकोस. कारण आता तू त्यांच्याकडे राहशील आणि जेव्हा केव्हा तुझं काम सुरू होइल, तू काहीतरी करशीलच; तेव्हा तू केलेलं दिसणार नाही. आम्ही त्याला पाठिंबा दिला असं बोललं जाईल, हे नकोय मला. त्यामुळे तेवढं तू पाळ माझ्यासाठी आणि मुंबईत राहा.”
‘मराठी मनोरंजन विश्व’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे प्रसाद मुंबईत त्याला अखेर घर कसं मिळालं याबाबत सांगत म्हणाला, “स्वामींच्या कृपेमुळे मला घर मिळालं. मुंबईत नवीन असताना मी पहिल्यांदा दादर येथील स्वामींच्या मठात गेलो, त्यांचे आभार मानले आणि त्यांना परिस्थिती सांगितली आणि पुढे शिवाजी पार्ककडे निघालो. मला त्यावेळी मुंबईत कशी पद्धत आहे याबाबत माहिती नव्हती. मी बघत होतो कुठे पाटी लावली आहे का किंवा कुठे काही जाहिरात आहे का, पण कुठेच काहीच दिसलं नाही. मग मी तेथील इमारतींमध्ये जाऊन बघत होतो कुठे भाड्याने घर मिळेल का, पण बराच वेळ निघून गेला आणि काम झालं नाही म्हणून एका टपरीजवळ जाऊन बाबांना फोन करायचं ठरवलं की इथे काही होत नाहीये, मी पुण्याला परत येतो. तेव्हा तिथे चहा पित असताना पांढरा सदरा वगैरे परिधान केलेले एक काका होते. चहा पिता पिता त्यांनी सहज विचारलं, बाळा कुठून आलास? मी म्हटलं पुण्याहून आलोय आणि त्यांनी मला अचानक जागेचं काम झालं का असं विचारलं हे ऐकून मला आश्चर्य वाटलं, म्हणून मी विचारलं तुम्हाला कसं कळलं?”
स्वामींच्या प्रचितीचा किस्सा सांगत प्रसाद पुढे म्हणाला, “मी त्यांना सांगितलं की, अजून जागा मिळाली नाहीये. शोधत आहे. ते म्हणाले, जरा माझ्याबरोबर चल. मी म्हटलं कुठे? ते म्हणाले तू चल, मी म्हणेन तिथे थांब आणि मी वरून हाक मारली की मग वर ये. म्हटलं ठीक आहे. एक ठिकाणी पोहोचल्यानंतर वर गेल्यावर काकांनी पाच मिनिटांनी आवाज दिला. मी वरती गेल्यानंतर तिथे एक काकू होत्या. ते म्हणाले, या आहेत, यांच्याशी बोलून घे, मी खाली थांबलो आहे. त्यानंतर मी त्या काकूंशी बोललो आणि त्यांनी त्यांच्याकडे राहण्याची सोय होणार असल्याचं सांगितलं. तेव्हा मला रडू की हसू कळत नव्हतं, पण तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून मी त्या काकींना माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण गळ्यातील चेन ठेवतो असं सांगितलं. चेन स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आणि मला तिथे राहण्याची परवांगी दिली, नंतर खाली आलो तर ते काका तिथे नव्हते. त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं स्वामींनीच घडवून आणलं.”