जवळजवळ पाच वर्षांहून अधिक काळानंतर ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. शिवाजी साटम म्हणजेच एसीपी प्रद्युम्न, दयानंद शेट्टी म्हणजेच दया आणि आदित्य श्रीवास्तव म्हणजेच अभिजीत दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मात्र, दुसऱ्या सीझनमधून शिवाजी साटम यांची एक्झिट होणार, अशा बातम्या आल्यावर प्रेक्षकांमध्ये नाराजी होती. त्यांच्या पात्राचा मृत्यू दाखवून शोमध्ये नव्या अभिनेत्याला आणलं गेलं.
‘सीआयडी २’ च्या निर्मात्यांनी टीआरपीमुळे हा मोठा बदल केला. यानंतर पार्थ समथानची एसीपी आयुष्मान म्हणून मालिकेत एंट्री झाली. शिवाजी साटम यांच्या एक्झिटने त्यांचे चाहते नाराज झाले. तर, पार्थ समथानचे चाहते मात्र त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून खुश झाले होते. मात्र, आता या मालिकेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. पार्थ या मालिकेतून निरोप घेतोय.
पार्थ समथानची ‘सीआयडी 2’ मधून एक्झिट
पार्थ समथानने स्वतः ‘सीआयडी 2’ शो सोडत असल्याची माहिती दिली आहे. पिंकव्हिलाशी बोलताना पार्थ समथानने पुष्टी केली की तो ‘सीआयडी 2’ सोडत आहे, कारण शिवाजी साटम पुन्हा शोमध्ये परतले आहेत. पार्थ या शोमध्ये फक्त काही भागांसाठीच येणार होता, परंतु कथानकामुळे त्याचा शोमधील मुक्काम वाढला. तो आता शो सोडतोय, कारण त्याच्याकडे इतर कामं आहेत जी त्याला वेळेत पूर्ण करायची आहेत.
मालिका सोडण्याबद्दल पार्थ काय म्हणाला?
पार्थ म्हणाला, “सुरुवातीला, आम्ही याबद्दल काहीही पुष्टी करू शकलो नाही कारण त्यामुळे शोची रंजकता टिकून राहिली नसती. आता शिवाजी सर परतल्यामुळे कथेत एक रोमांचक ट्विस्ट येणार आहे.” प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल पार्थ समथानने चाहत्यांचे आभार मानले. “माझ्याकडे इतर बरीच कामं आहेत, त्यामुळे मी या शोमध्ये जास्त काळ राहू शकत नाही. पण हो, प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे,” असं पार्थने नमूद केलं.
‘सीआयडी 2’ मध्ये एंट्री करण्यापूर्वी पार्थ समथानने ‘कसौटी जिंदगी की 2’ मध्ये काम काम केलं होतं. त्यानंतर त्याने चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलं. ५ वर्षांच्या ब्रेकनंतर पार्थ ‘सीआयडी 2’च्या माध्यमातून टीव्हीवर परतला होता. मात्र, त्याची भूमिका फार कमी काळासाठी होती. पुढे पार्थ कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.