Tejashri Pradhan and Subodh Bhave on late marriages: गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेची मोठी चर्चा सुरू आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच पार पडला. ११ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मालिकेत तेजश्री स्वानंदी आणि सुबोध भावे समर या भूमिकेत दिसणार आहेत. दोघांचेही वय जास्त असूनही लग्न झाले नाही, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे कळत नकळत दुखावताना दिसतात.
“पूर्वीच्या काळापासून चालत आलेले लग्नाचे…”
आता एका मुलाखतीत सध्या अनेक जण उशिरा लग्न करत आहेत, यावर तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी वक्तव्य केले आहे. या दोन्ही कलाकारांनी नुकतीच कलाकट्टाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, मालिका उशिरा लग्न करण्याबाबत भाष्य करतेय, तर तुम्हाला काय वाटतंय? यावर तेजश्री म्हणाली, “कदाचित आताच्या काळातील तो गरजेचा विषय आहे, कारण पूर्वीच्या काळापासून चालत आलेले लग्नाचे वय आता पुढे सरकताना दिसत आहे.”
“करिअर आणि इतर गोष्टी, सध्याची स्पर्धा पाहता आजच्या काळात लोकांची लग्नं उशिरा होत आहेत, त्यामुळे साधर्म्य असणारा कंटेंट लोकांना आवडतो; त्यामुळे मला वाटतं की ही मालिका लोकांंना आवडेल.
“दुर्देवाने परिस्थितीमुळे बिचारे ते…”
सुबोध भावे म्हणाले, “काही लोकांचं असं नाहीये की त्यांना लग्न करायचे नाही, त्यांना करायचं असतं; पण दुर्देवाने परिस्थितीमुळे बिचारे ते पिचलेले असतात की त्यांच्या मनातील स्वप्ने तशीच राहून जातात. घरची कारणं, गरिबी, आजारपण अशी काहीही कारणं असू शकतात. कदाचित ज्या काळात त्यांना लग्न करायचं असेल तेव्हा त्यांना हवा तसा जोडीदार मिळत नसेल. काही वर्षे त्यात घालवल्यानंतर रस निघून जात असेल.
अगदी कमी लोक असतील की ज्यांनी असं ठरवलेलं असेल की त्यांना लग्न करायचं नसेल. पण, बाकी लोकांना परिस्थितीमुळे लग्न करणे शक्य झाले नसेल आणि अशा लोकांनी आयुष्याच्या नंतरच्या काळात लग्न केलं, तर त्यावर कोणाला समस्या असण्याचं कारण नाही. कारण ते काही लग्नासाठी इतर कोणाकडून पैसे घेऊन लग्न करत नाही किंवा त्यांचा संसार तुम्हाला चालवायला सांगतात असंही नाही. ते त्यांचं बघतील. त्यांनी कुठल्या वयात लग्न करायचं हा त्यांचा निर्णय आहे. पण, ते बिचारे जर घरगुती परिस्थितीमुळे किंवा काही समस्यांमुळे लग्न लवकर करू शकले नसतील, तर आनंद मिळवण्याचा त्यांचा हक्क नाहीये का? एक जोडीदार मिळवण्याचा त्यांना हक्क नाही का?”, असे म्हणत सुबोध भावे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
दरम्यान, तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांची नवीन मालिका काय कमाल करणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.