Amit Bhanushali On Fatherhood : अभिनेता अमित भानुशाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून अर्जुनची भूमिका साकारत अभिनेता घराघरात पोहोचला. त्यामुळे त्याचा आता खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अमित भानुशाली सोशल मीडियावरही सक्रिय असतो. त्यामार्फत तो त्याच्या कुटुंबीयांबरोबरचे व मुलाबरोबरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करतो. अशातच नुकतंच अभिनेत्यानं त्याच्या मुलाच्या जन्मानंतर त्याचं आयुष्य कसं बदललं याबाबत सांगितलं आहे.
अमितने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात व त्याच्यामध्ये काय बदल झाले याबद्दल सांगितलं आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित म्हणाला, “मुलाच्या जन्मापूर्वीचं आयुष्य आणि त्याच्या जन्मानंतरचं आयुष्य यामध्ये खूप फरक आहे. आधी जो अमित भानुशाली होता, तो आज नाहीये. मला असं वाटतं की, प्रत्येक पुरुष जेव्हा बाबा होत असेल तेव्हा त्याच्या आयुष्यात हा बदल होत असेल”.
अमित याबाबत पुढे म्हणाला, “जो मुलगा वडील होण्यापूर्वी त्याच्या आई-बाबांवर कधी रागावतो, कधी उलट उत्तर देतो तेव्हा त्याला त्यांची किंमत कळत नाही. पण जेव्हा तो वडील होतो. जेव्हा त्याच्या मुलाचा जन्म होतो आणि तो त्याचा सांभाळ करतो, तो आजारी असताना त्याची जी हालत होते. तेव्हा तो बऱ्याचदा रडतो. मी स्वत: रडलो आहे आणि तेव्हा आपल्याला आपल्या आई-वडिलांची किंमत कळते. त्यामुळे माणूस म्हणून तुमच्यामध्ये खूप बदल होतो”.
अमित त्यानंतर पुढे म्हणाला, “मुलाच्या जन्मानंतर आपल्यामध्ये खूप बदल होतो. समजूतदारपणा वाढतो. कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते कळतं”. अमितला हृधान नावाचा एक गोंडस मुलगा आहे. अमित अनेकदा त्याच्याबरोबरचे गोड फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.