टीव्ही जगताला १६ ऑक्टोबरला आणखी एक मोठा धक्का बसला. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वैशालीने इंदौरमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. मागच्या वर्षभरापासून ती इंदौरमध्ये राहत होती. वैशालीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर तेजाजी नगर पोलीस ठाण्यात याबाबत केस दाखल करण्यात आली. यावेळी तिच्याकडे एक सुसाइड नोटही सापडली आहे.

वैशाली ठक्करच्या सुसाइड नोटची माहिती आता समोर आली आहे. एएनआयने केलेल्या ट्वीटनुसार, वैशाली मागच्या काही काळापासून खूप तणावाखाली होती. याबाबतचा उल्लेख तिने या सुसाइड नोटमध्ये केला आहे. या नोटमध्ये वैशालीने तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत असल्याचंही म्हटलं आहे. त्याच्या त्रासाला ती खूप कंटाळली होती.

आणखी वाचा- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करची आत्महत्या, सुसाईड नोट जप्त

वैशालीच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये वैशालीने चाहत्यांना तिच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर रोका समारंभाचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि याचबरोबर होणारा नवरा डॉ. अभिनंदन सिंहच्या नावाच्या खुलासा केला होता. या कार्यक्रमात फक्त अभिनेत्री आणि तिच्या पतीचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अभिनंदन हा केनियामधील डेंटल सर्जन होता. त्यानंतर जवळपास महिन्याभरातच वैशालीने जून महिन्यात होणारं तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. तिने काही काळानंतर तिचा रोका सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट केला.

आणखी वाचा- अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन करणं कॅब चालकाला भोवले, २४ तासांच्या आत पोलिसांकडून बेड्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशाली ठक्करने ‘ससुराल सिमर का’मध्ये अंजली भारद्वाज ही भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘सुपर सिस्टर्स’, ‘विष या अमृत: सितारा’, ‘मनमोहिनी २’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. वैशाली ठक्करने स्टार प्लसवरील सर्वाधिक काळ सुरू असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने २०१५ ते २०१६ या काळात संजना ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘ये है आशिकी’मध्येही दिसली होती. ‘रक्षाबंधन’ ही तिची अखेरची मालिका होती.