Aamhi Sare Khavayye Time Change : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या वेळेत नुकताच बदल करण्यात आला आहे. आता नव्या वेळेनुसार हा शो ९ नव्हे तर रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केला जात आहे. ‘चला हवा येऊ द्या’ पाठोपाठ आता वाहिनीवरील आणखी एका शोच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
‘झी मराठी’वर जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ९ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजेच बरोबर महिन्याभरापूर्वी ‘आम्ही सारे खवय्ये’ हा शो पुन्हा सुरू झाला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करत आहे. यंदा शोची थीम पूर्णपणे बदलण्यात आली आहे. ‘आम्ही सारे खवय्ये- जोडीचा मामला’ अशी यंदाची थीम असून गेल्या महिन्याभरात मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या जोड्या यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
महिन्याभरात हेमंत ढोमे-क्षिती जोग, कुशल बद्रिके-सुनयना, शिवानी रांगोळे- विराजस कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे व तिचा पती स्वप्नील राव, अक्षया देवधर- हार्दिक जोशी, अभिजीत- सुखदा असे अनेक कलाकार या शोमध्ये सहभागी झाले होते. प्रेक्षकांचा सुद्धा या शोला हळुहळू चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, महिन्याभरातच वाहिनीने या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आम्ही सारे खवय्ये’ हा शो सुरू झाल्यावर शनिवार व रविवार दुपारी १ वाजता प्रसारित केला जायचा. मात्र, आजपासून ( ८ सप्टेंबर ) हा शो सोमवार आणि मंगळवार दुपारी १ वाजता प्रसारित केला जाईल.
८ सप्टेंबरच्या भागात या शोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचे पती सहभागी होणार आहेत.
दरम्यान, ‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरुवातीपासून दुपारच्या सत्रात प्रसारित केला जातो. घराघरांतील गृहिणी मोठ्या आवडीने हा कार्यक्रम पाहतात. आजवर प्रशांत दामले, राणी गुणाजी, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांनी हा कार्यक्रम होस्ट केला आहे. २००७ पासून वाहिनीवर या कार्यक्रमाची सुरूवात झालेली होती. आता येत्या दिवसांत आणखी कोणकोणते कलाकार शोमध्ये सहभागी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.