समीर जावळे

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अजरामर कविता. वीर सावरकर यांच्या अनेक कविता या आजही लोकांच्या मनात रुंजी घालत आहेत. तसंच त्यांचं लिखाणही अनेक पिढ्यांना प्रेरणा देतं आहे. ‘सागरा प्राण तळमळला..’ या कवितेची आठवण लता मंगेशकर यांनी सांगितली होती. ‘वीर सावरकर’ सिनेमाच्या निमित्ताने या कवितेची चर्चा पुन्हा एकदा होते आहे. लता मंगेशकरांनी याबाबत काय सांगितलं होतं? या कवितेला चाल कशी लावली? हे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं आहे तर शंकर वैद्यांनी या कवितेचा अर्थ उलगडून सांगितला आहे. हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत.

bollywood holi celebration in mumbai
Video: बॉलिवुडच्या ‘होली’ उत्सवाची सुरुवात कुठून झाली माहिती आहे? मुंबईतल्या ‘या’ ठिकाणाचा दिला जातो दाखला!
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब

लता मंगेशकर यांनी सांगितली वीर सावरकरांच्या पहिल्या भेटीची आठवण

“तात्याराव सावरकर हे आमच्या कुटुंब स्नेह्यांपैकीच एक होते. आमच्या घरात त्यांचा उल्लेख कायम होत असे. माझ्या लहानपणीची एक आठवण आहे. माझे वडील (दिनानाथ मंगेशकर) एक दिवस हरिजन वस्तीत चालले होते. त्यांच्याकडे मी देखील हट्ट धरला, की मलाही तुमच्याबरोबर यायचं, आई (माई मंगेशकर) मला म्हणाली तू जाऊ नकोस. तेव्हा मी बाबांना विचारलं तुम्ही कुठे चाललात? तिथे कोण येणार आहे? तर ते म्हणाले मी हरिजन वस्तीत चाललो आहे. तिथे सहभोजनाचा कार्यक्रम आहे जो तात्याराव सावरकरांनी ठेवला आहे. त्या काळात हरिजनांसह सहभोजन ही खूप मोठी गोष्ट होती. तिथून तात्याराव सावरकर (विनायक दामोदर सावरकर) आणि माझी ओळख झाली. अशी आठवण लता मंगेशकर यांनी सांगितली होती.

चित्रपटाच्या मुहूर्ताला लता मंगेशकरांनी दिलं निमंत्रण

माझे वडील गेल्यानंतर मी एकदा तात्याराव सावरकरांना मुंबईत भेटले. माझ्या एका चित्रपटाच्या मुहूर्तासाठी मी त्यांना निमंत्रण दिलं. त्यावर मला तात्याराव म्हणाले ‘मी फार अभागी आहे मला तू बोलवू नकोस तुझा चित्रपट चालणार नाही.’ त्यावर मी त्यांना म्हटलं की माझा चित्रपट चालला नाही तरीही चालेल पण तुम्ही मुहूर्ताला आलं पाहिजे, त्यानंतर ते आले. त्यानंतर आमचं त्यांच्याकडे येणंजाणं होऊ लागलं. माझ्या वडिलांना आईच्या हातचे काही पदार्थ आवडत असत, तसंच तात्यारावांनाही ते आवडत. आम्ही तात्याराव सावरकरांसाठी काही पदार्थ घेऊन जायचो. त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नसायची पण आम्ही प्रेमानं दिलंय म्हणून ते तो पदार्थ खात असत अशी आठवणही लता मंगेशकर यांनी सांगितली होती. ‘सागरा प्राण तळमळला’ हे गाणं चार मंगेशकर भगिनींसह हृदयनाथ मंगेशकरांनी १९९२ मध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त गायलं होतं. त्यानिमित्ताने शंकर वैद्य यांनी सह्याद्री वाहिनीवर लता मंगेशकर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी तात्याराव सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांच्या आठवणींचा पटच उलगडला.

‘सागरा प्राण तळमळला’ कवितेची आठवण

“तात्याराव सावरकर खूपच आजारी झाले होते. त्यावेळी पुणे विद्यापीठाने एक कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी आम्ही एक कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. त्या कार्यक्रमात हृदयनाथने तात्याराव सावरकर यांची ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता घेतली आणि त्या कवितेला चाल लावली. कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला मी गेले होते. मात्र तात्यारावांना पायाच्या दुखण्यामुळे येणं शक्य नव्हतं. पण त्यांनी मला सांगितलं, ‘मी जरी तिथे आलो नाही तरीही मी इथे तुम्हाला ऐकेन आणि माझा आशीर्वाद आहे तुम्हाला’. मी त्यांचा आशीर्वाद घेऊन आले आणि आम्ही पाचही भावंडांनी हे गाणं गायलं होतं.” अशी आठवण लता मंगेशकरांनी सांगितली होती.

हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितली वीर सावरकरांची आठवण

‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता माझ्याकडे आली तेव्हा मी विलक्षण भारावून गेलो होतो अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी याच मुलाखतीत सांगितली. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “कविता वाचल्यावर मी थेट १९४२ मध्येच पोहचलो. तेव्हा मी खूप आजारी होतो. मी रडायला लागलो की आई मला पुस्तक वाचून दाखवत असे. ‘संन्यस्त खड्ग’ अनेकदा आईने वाचलं आणि मी ऐकलं होतं. ‘सख्यास मांडिले मी युद्ध रुसुनी’ ही कविता ऐकली होती. साहित्याचा तो सहवास चांगल्या कापडाला अस्तर लागावं तसा आमच्या आयुष्याला लाभला. मला ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता चाल लावण्यासाठी मिळाली तेव्हा मी तात्याराव सावरकरांच्या घरी पोहचलो. हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर असं त्यांना लिहून पाठवलं. मला तेव्हा त्यांनी वर बोलवून घेतलं. मी लहान होतो. लहान मुलाशी कसं बोलतात तसंच ते माझ्याशी बोलत होते. मी तात्याराव सावरकरांना म्हटलं आपली स्वाक्षरी हवी. मी त्यांच्या हातात पेन ठेवलं तेव्हा त्यांनी मला विचारलं की ‘याला काय म्हणतात?’ सावरकरच उत्तरले ‘झरणी’ त्यानंतर त्यांनी मला एक पुस्तक दिलं त्यावर सही दिली आणि ‘अक्षर सुधारा’ असंही लिहून दिलं. माझं अक्षर चांगलं आहे तो तात्याराव सावरकरांचा आशीर्वाद आहे.” अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली होती.

‘सागरा प्राण तळमळला’ची चाल कशी सुचली?

“वीर सावरकर यांनी ‘संन्यस्त खड्ग’ हे नाटक लिहिलं होतं. ज्यावर खूप टीका झाली. त्या टीकेबाबत कोल्हटकर तात्याराव सावरकरांना प्रश्न विचारायला गेले. ही आठवण माझ्या वडिलांच्या कंपनीच्या वेळची आहे. कोल्हटकरांनी वीर सावरकरांना छापून आलेली टीका दाखवली. त्यावर वीर सावरकर म्हणाले, ‘रोजच दूध भात खात आहेत, एक दिवस तिखट रस्साही खाल्ला तर चालतो.’ चालीचा मूड बदलताना हे सूत्र मी माझ्या डोळ्यांसमोर ठेवलं होतं” अशी आठवण हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांनी वीर सावरकरांच्या आठवणी जागवल्या. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मुलाखत झाली होती. त्यात हा उल्लेख करण्यात आला आहे.

शंकर वैद्य यांनी सांगितला कवितेचा अर्थ

‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेत तीन व्यक्ती आहेत. एक आई, एक मुलगा आणि सागराची भूमिका खलनायकाची आहे. कपटी, फसवा, दुष्ट , कावेबाज सागर तिथे घेतला आहे. आई आणि मुलाचं प्रेम त्याच्यात व्यत्यय आणणारा आणि ताटातूट घडवणारा सागर वीर सावरकरांनी उभा केला आहे. या कवितेत दुसऱ्या कडव्यात सागराचा उल्लेख नाही. सागर हा चालीतून आणि कवितेतून त्याचं आंदोलन सुरु आहे. दुसऱ्या कडव्यात सागराचा उल्लेख येत नाही कारण ती ताटातूट झाली आहे. त्या नायकाच्या मनाला हताशपण आलं आहे ते दुसऱ्या कडव्यातून दाखवलं आहे. त्यामुळे तिथे त्याचा उल्लेख नाही. दशदिशा तमोमय होती असे शब्द आहेत. खंतित एकाग्र होणं तिथे आहे त्यामुळे सागर तिथे आलेला नाही असं वाटतं. ताटातूट झाली आणि आईची आणि आपली गाठभेट होणार नाही म्हटल्यावर देशाची चित्रं सावरकरांना दिसली आहेत. ती ‘आम्रवृक्ष वत्सलता’ दिसते, तो ‘बाल गुलाब’ आणि मग ते फुलबागेवर येतात. मला वाटतं या ठिकाणी हे नुसतं निसर्ग चित्रण नाही. ती ‘आम्रवृक्ष वत्सलता’ असं म्हणताना आणि ‘बाल गुलाबही आता’ म्हणताना सावरकरांसमोर त्यांच्या घरातली व्यक्ती असावी. वीर सावरकरांनी ते खूप चतुराईने सूचित ठेवलं आहे. पुढे ‘फुलबाग मला हाय पारखा झाली’ असं ते म्हणतात ही माणसं आणि देश मला पारखा झाला याचं दुःख दिसून येतं. शेवटच्या कडव्यात सावरकरी बाणा कडवेपणाने आला आहे. वेगवेगळ्या भाववृत्ती या कवितेत आहेत. पहिल्या कडव्यात सावरकर आरोप ठेवतात तो वचनभंगाचा. दुसऱ्या कडव्यात हताशपणा आला आहे. तिसऱ्या कडव्यात आईचं आणि आपलं प्रेम किती आहे ते सांगितलं आहे. सागराला कळावं म्हणून सरितेच्या प्रेमाची शपथही त्याला घातली आहे. तेही ऐकत नाही म्हटल्यावर का ‘वचन भंगीशी ऐसा’ म्हणत सावरकरांनी ब्रह्मास्त्र काढलं आहे. ‘अबला न माझीही माता रे.. कथिल हे अगस्तीस आता रे.. जो आचमनी एक क्षणी तुज प्याला सागरा प्राण तळमळला’ हे सावरकर म्हणतात. असा अर्थ शंकर वैद्य यांनी सांगितली आहे. सह्याद्रीवर झालेल्या दुर्मिळ मुलाखतीचा अंश युट्यूबवर उपलब्ध आहे.