ऑगस्टमध्ये राज्यात १ लाख ४ हजार ५६ घरांची विक्री; मुंबईचा आकडा ६७८४ च्या घरात

मुंबई : राज्यातील गृहविक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने राज्य सरकारला मिळणाऱ्या महसुलात ऑगस्टमध्ये मोठी घट झाली आहे. जुलैमध्ये १ लाख ३६ हजार ३३७ घरांची विक्री झाली होती आणि यातून राज्याला १ हजार ८३५ रुपयांचा महसूल मिळाला होता. पण ऑगस्टमध्ये मात्र यात कमालीची घट होऊन घरविक्रीचा आकडा १ लाख ४ हजार ५६ वर आला आहे. जुलैमध्ये राज्यात घरविक्री घटली असताना मुंबईत मात्र वाढ झाली होती. पण ऑगस्टमध्ये मुंबईतील घरांच्या विक्रीतही घट झाली आहे. जुलैमध्ये ९ हजार ८२३ घरे विकली गेली होती आणि यातून ५६६ कोटींचा महसूल मिळाला होता. ऑगस्टमध्ये मात्र मुंबईत केवळ ६७८४ घरे विकली गेली असून यातून ४२० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

मुद्रांक शुल्क दरातील सवलत बंद झाल्यानंतर अर्थात एप्रिलपासून घरविक्री आणि महसुलात घट झाली. पण जूनमध्ये घरविक्री आणि महसुलात वाढ होऊ लागली असे वाटत असतानाच जुलैमध्ये घरविक्रीत काहीशी घट झाली. जूनमध्ये यात वाढ होऊन १ लाख ४५ हजार ३४९ घरांची विक्री झाली होती, तर यातून १ हजार ४९४ कोटींचा महसूल मिळाला होता. जुलैमध्ये मात्र घरविक्रीचा आकडा १ लाख ३६ हजार ३३७ वर आला. मात्र या महिन्यात महसुलात वाढ दिसून आली. जुलैमध्ये १८३५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. ऑगस्टमध्ये घरविक्री आणि महसूल दोन्हींत मोठी घट झाली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये राज्यभरात १ लाख ४ हजार ५६ घरे विकली गेली आहेत. या घरविक्रीतून सरकारला १५०६ कोटींचा महसूल मिळाला आहे. जुलैच्या तुलनेत जवळपास ३२ हजार घरे कमी विकले गेले आहेत. त्याच वेळी मुंबईत जुलैमध्ये विक्रमी अशी ९८२३

घरांची विक्री झाली होती. यातून ५६६ कोटींचा महसूल मिळाला होता. महत्त्वाचे म्हणजे २०१२ नंतर मुंबई ऑगस्टमध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणावर घरविक्री झाली होती.

दिवाळीत दिलासादायक वातावरण असेल!

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येही घरविक्रीत वाढ होण्याची शक्यता दिसत नाही, कारण तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही लाट आली तर मग टाळेबंदी होऊन बांधकाम क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसेल. पण जर सरकारने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्क कपात लागू केली तर नक्कीच दिवाळीत बांधकाम क्षेत्रात दिलासादायक चित्र दिसेल, असे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

करोना आणि टाळेबंदीचा फटका बांधकाम क्षेत्राला बसत आहे. मागील दोन महिन्यांत राज्यातील घरविक्रीत घट होण्यास करोना आणि टाळेबंदी ही मुख्य कारणे आहेत. पण पावसाळ्यात दरवर्षी विक्रीत घट दिसून येते. अशात करोनाचा फटका बसल्याने परिणाम अधिक दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्राहकही आर्थिक अडचणीत आहेत. अशा वेळी बांधकाम क्षेत्र आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रोत्साहन म्हणून मुद्रांक शुल्क दरातील कपातीची सवलत लागू करणे आता अत्यंत आवश्यक आहे. तशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. सरकारने ही मागणी मान्य केली तरच हे चित्र बदलले.

– नयन शाह, माजी अध्यक्ष, एमसीएचआाय, क्रेडाई