‘फेसबुक’वर प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पालघर येथील शाहीन धाडा (२१) आणि रेणू श्रीनिवासन (२१) या दोन्ही तरुणींवरील आरोप अखेर सोमवारी पोलिसांनी मागे घेतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या बंदला शाहीनने फेसबुकवर विरोध दर्शविला होता, तर रेणूने तिला पाठिंबा दिला होता.
 सोमवारी पालघर न्यायालयात पोलिसांनी अर्ज करून या दोन्ही तरुणींवरचे आरोप मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता शाहीन आणि रेणू या प्रकरणातून पूर्णपणे बाहेर पडल्या आहेत. आपल्यावरील गुन्हे मागे घेतले गेल्याने शाहीनने आनंद व्यक्त केला असून आज खऱ्या अर्थाने मुक्तता झाल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, शाहीनच्या काकांच्या धाडा रुग्णालयावरील हल्ल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी प्रकाश जांभळे, अनिल पोळ आणि वैभव उपाध्याय या तिघांना अटक केली आहे. या तिघांना २० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.