काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या सूचना

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकडे, काँग्रेस मंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्या. काँग्रेसचे पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्य़ांत मंत्र्यांनी लक्ष घालून पक्ष संघटना बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दादर येथील टिळक भवन या प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी काँग्रेसचे मंत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, मोहन जोशी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खरगे म्हणाले की, सरकार काम किमान समान कार्यक्रमावर चालले पाहिजे. काँग्रेसच्या मंत्र्यांकडे जे जिल्हे पालकमंत्री म्हणून आले आहेत त्या जिल्ह्य़ात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच ज्या जिल्ह्य़ांना काँग्रेसचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेत्यांनी सरकारच्या योजना, सरकारने केलेले काम जनतेपर्यंत नेऊन काँग्रेसला बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांना केले.

लोकदरबार उपक्रमाचे कौतुक

मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रालयाजवळ गांधी भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात लोकदरबार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पहिल्याच उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे समर्थन करीत काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी लोकदरबार भरवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही खरगे यांनी केल्याचे सांगण्यात आले.

समन्वय समितीवर थोरात, चव्हाण : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीवर काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे ज्येष्ठ मंत्री काम पाहतील, अशी शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.