कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांना डावलल्याचे शिवसेनेने मुंबईत उट्टे काढले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या कल्याण येथील मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलण्यात आल्याचा वचपा शिवसेनेने सागरी किनारा मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यात काढला आहे. सागरी किनारा मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने निमंत्रित केले नाही. त्यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी असून यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा भाजपसाठी महत्त्वाचा असल्याने सध्या मूग गिळून गप्प राहण्याची सूचना वरिष्ठ नेत्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच वाहतुकीला गती देण्यासाठी नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी येथील सागरी सेतूदरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्प उभारणीची जबाबदारी पालिकेवरच सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा रविवार, १६ डिसेंबर रोजी अमरसन्स उद्यान, कंबाला हिल, वरळी येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला असून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन कल्याण येथे १८ डिसेंबरला करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचे उट्टे काढत शिवसेनेने सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा घाईघाईने ठरवून मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले नाही. सागरी किनारा मार्ग प्रकल्प उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्र सरकारच्या १९ परवानग्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून मिळवून दिल्या आहेत. तरीही भूमिपूजन सोहळ्यापासून मुख्यमंत्र्यांनाच दूर ठेवल्यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर कार्यालयीन वेळेमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना तासन्तास वाहनांमध्ये अडकून पडावे लागते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीदरम्यान सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सागरी सेतूदरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्यात येणार आहे. या टप्प्यातील प्रकल्पाच्या कामाची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ९.९८ कि.मी. लांबीच्या सागरी किनारा मार्गाचे भूमिपूजन रविवारी करण्यात येणार आहे.

सागरी किनारा मार्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुंबई महापालिकेचा आहे. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले नसावे. हे तपासून पाहावे लागेल.   – विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सागरी किनारा मार्ग प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून केंद्र सरकारच्या १९ प्रकारच्या आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवून दिल्या आहेत.   – आशीष शेलार,अध्यक्ष, मुंबई भाजप