वेळापत्रकात बदल करण्याची मागणी
मुंबई : राज्याच्या प्रवेश नियमन प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होणार असून त्यामुळे विद्यार्थी गोंधळले आहेत.
विद्यापीठांच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होत असून साधारण २१ ऑक्टोबपर्यंत या परीक्षा आहेत. सध्या पुनर्परीक्षार्थीच्या (बॅकलॉग) परीक्षा सुरू आहेत. याच दरम्यान परीक्षा नियमन प्राधिकरणानेही प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. शारीरिक शिक्षणशास्त्र (बीपी.एड) पदवीची प्रवेश परीक्षा ११ ते १६ ऑक्टोबर दरम्यान घेण्याचे नियोजन केले आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, जळगाव या ठिकाणी होणार असून प्रवेश परीक्षा द्यावी की, अंतिम वर्षांची परीक्षा द्यावी, अशा पेचात प्रवेशोत्सुक विद्यार्थी सापडले आहेत.
या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये परराज्यातील ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आहेत. त्यातच प्राध्यापकांसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) याच कालावधीत होणार आहे. या पाश्र्वभूमीवर या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी ‘अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघा’ने केली आहे. ‘एका दिवसाची प्रवेश परीक्षा किंवा अंतिम वर्षांचे गुण आणि खेळातील प्रावीण्य या आधारे गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात यावेत,’ असे निवेदन संघटनेने दिले आहे. विद्यापीठांकडे परीक्षांबाबत माहिती विचारण्यात आली असून त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने कळवले आहे.