राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार वाय. पी. त्रिवेदी यांच्या खासदार निधीतून ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विकास कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पत्र लिहून केली आहे.
त्रिवेदी यांच्या खासदार निधीतून गोरेगावच्या विकास कामांकरिता ४० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, त्यातून कोणतीही विकास कामे झाली नाहीत. उलट बोरिवली, विक्रोळी या ठिकाणी बांधण्यात आलेली शौचालये, बालवाडी, लादीकरण आदी कामांची खोटी छायाचित्रे लावून निधीवर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या मदतीने डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले होते. लोकसत्ताने या गैरव्यवहाराला वाचा फोडली होती.