चिन्मयी सुमित
या मनोगताच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे मी भाषातज्ज्ञ नाही आणि ‘शिक्षण’ या विषयाची अभ्यासकही नाही. ‘मातृभाषेतून शिक्षण ह्या विषयावरची माझी मते ही स्वानुभवावर आधारित आहेत. बहुतांश आयएएस अधिकाऱ्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकत. पण आमच्या घरात आई मानसशास्त्रज्ञ असल्याने तिने आणि वडिलांनी आपसात चर्चा करून आम्हा दोघींना मराठी माध्यमात घातले. याबद्दल आम्ही दोघी बहिणी अत्यंत कृतज्ञ आहोत.
माझ्या पहिल्या मुलासाठी, नीरदसाठी ‘मराठी’ शाळेचे माध्यम निवडताना ‘मराठी’ हा माझा ‘कल’ होता, अट्टहास नाही. सुमित इंग्रजी माध्यमामधला. त्याचे वडील कॉन्व्हेन्टमधले. दक्षिण भारतीय असल्याने तमिळ खालोखाल इंग्रजी उत्तम लिहिणारे, वाचणारे. आजही घरात रोजच्या संभाषणात इंग्रजी सर्रास बोलली जाते. त्या सर्वासाठी माझा हा मानस धक्कादायक नसला, तरी स्वीकारायला फारसा सोपा नव्हता. नीरद झाल्यावर मी संगोपनात गुंतले आणि पूर्ण अर्थार्जनाचा भार सुमितवर पडला. तो कामात इतका व्यग्र झाला आणि ही व्यग्रता अधिकच वाढणार, त्यामुळे मुलाचे एकल पालकत्व किमान शिक्षणापुरते तरी माझ्याकडे येणार असे सुमितला वाटले. त्यामुळे त्याला माझा ‘माध्यम निर्णय’ मान्य होता. पण मला मुलांच्या बाबतीतला कुठलाच निर्णय हा माझा एकटीचा किंवा फक्त त्यांच्या आईवडिलांचा नको होता. त्यांच्या आजी-आजोबांनाही तो निर्णय आपलासा वाटणे गरजेचे होते. मी माझ्या आईची मदत घेतली. ती मानसशास्त्रज्ञ आणि सतत नवीन गोष्टी, बदललेली तत्त्वं शिकवणारी, तिनेच जगभरात झालेले मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दलचे, निरनिराळ्या शिक्षण प्रणालींबद्दलचे संशोधन वाचून त्याचा सारांश मला ओळखीचा करून दिला आणि मगच नीरदचे शिक्षणाचे माध्यम हे मराठी असेल असे ठरले.
मला शेजारपाजार नेहमीच उत्तम मिळाला. प्रेम-काळजीतूनच शेजारी म्हणायचे, ‘तुझी मुले मोलकरणीच्या मुलांबरोबर बसून त्यांची भाषा बोलतील. शिव्या घालतील.’ मी म्हणायचे, ‘कदाचित ती मुले नीरद, दीयाची भाषा बोलतील. राग आला, वाईट वाटले तर शिव्याच वापरायला लागत नाहीत ही गोष्टी शिकतील.’ त्यांना माझे हे विचार अर्थातच रुचायचे नाहीत. पण पुढे मुलांच्या शाळेत चालणाऱ्या सर्व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांच्या याच मावश्या त्यांना ‘तयार’ करायला, मदत करायला माझ्यापेक्षा आघाडीवर असायच्या. त्यांच्या इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शाळेत त्यांना ही ‘मजा’ अनुभवता आली नव्हती. मुले घरात, शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणींत जी भाषा बोलत तीच शाळेतही बोलत आणि तिच्यातूनच ज्ञान, खरे तर माहिती मिळवत. त्यामुळे निराळी अपरिचित भाषा आधीपासून समजावून घेऊन, त्यात मग पुढे संकल्पना समजून घ्यायचा ताण त्यांच्यावर नव्हता. त्यामुळे खरेच त्यांचे शिक्षण आनंददायी ठरले.
सुमितला चांगले काम आणि बऱ्यापैकी पैसे मिळायला लागले. अभिनेता म्हणून तो ‘साजरा’ व्हायला लागला. सध्याचा प्रचलित ‘सेलिब्रिटी’ हा शब्द त्याच्या नावामागे जोडला जाऊ लागला, त्यावेळी मुले दुसरी-तिसरीत होती. पण मराठी शाळेत असल्याने ती नेहमी जमिनीवर राहिली. शाळेत आमच्याबद्दल कौतुक होते. नाही असे नाही. पण उदोउदो नव्हता. मुलांचे त्यांच्या गुणवत्तेवरून (म्हणजे त्यांना मिळणाऱ्या गुणांमुळे नाही तर लाघव, सहकार्य करायची वृत्ती आणि इतर असे गुण) कौतुक व्हायचे. आपण इतर मुलांपेक्षा खूप वेगळे वाटायला नको म्हणून मुले सुमितला गाडीतून शाळेला सोडायला मनाई करत. हा संस्कार आमच्यापेक्षा जास्त त्यांच्या शाळेने आणि तिथल्या मैत्रीने त्यांना दिला.
पुढे दहावी-बारावीला कॉलेजमध्ये गेल्यावर मुले बिचकतील. इंग्रजीमध्ये सारे शिक्षण समोर आल्यावर बावरतील असेही काही जणांचे मत होते. मी आधी सांगितले तसे आजी-आजोबांकडे गेल्यावर इंग्रजी कानावर पडायचेच. शाळेतही इंग्रजी संभाषणाचा मीनलताई परांजपे यांचा अभ्यासक्रम केला असल्याने मुले इंग्रजी उत्तम आणि बिनचूक बोलत.
नीरद आणि दीया बारावीपर्यंत ‘साठे महाविद्यालया’त शिकले. तिथे बरेच शिक्षक आणि मुलेही बहुतांश मराठीच होती. त्यामुळे निराळे काही वाटलेच नाही. पण नीरदने नंतर बीएमएमसाठी ‘जयहिंद कॉलेज’ला प्रवेश घेतला आणि निराळे चित्र समोर आले. पूर्णपणे बहुसांस्कृतिक महाविद्यालय. निरनिराळ्या प्रांतातून स्तरातून (आर्थिक, सामाजिक) आलेले विद्यार्थी आणि संवादाची भाषा फक्त इंग्रजी. भाषेपेक्षाही तिथल्या वातावरणात रुळायला नीरदला थोडा वेळ लागला. महिनाभर वगैरे. पण नंतर जसे सांस्कृतिक उपक्रम सुरू झाले, तसा नीरद मुलांमध्ये लोकप्रिय झाला. नीरदने ‘लंडन म्युझिक कॉलेज’च्या पियानोच्या परीक्षा दिल्या होत्या. तो उत्तम पियानोवादक आहे. त्या परीक्षा द्यायलाही युरोपिअन शिक्षक येत आणि नीरद त्यांच्याशी उत्तम संवाद साधत असे. त्याचे विचार, भावना स्पष्ट असत. त्यांचे फक्त इंग्रजीमध्ये त्याला भाषांतर करायचे असे. पुढे बीएमएममध्ये सामाजिक, राजकीय प्रश्न घेऊन चित्रपट बनवताना नीरदच्या मराठी माध्यमातल्या शिक्षणाचा त्याला खूप फायदा झाला. गावोगावी, खेडोपाडी गेल्यावर तिथल्या लोकांशी संवाद साधताना, अधिकाऱ्यांशी बोलताना त्याला विषयाचे आणि भाषेचे एक वेगळे भान जे होते, त्याने त्याचे काम प्रभावी ठरले. दीया ‘सिनेमॅटोग्राफी’ करण्याचे ठरवते आहे. जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट ती पाहते, संगीत ऐकते. नुसते इंग्रजीच नाही तर इतर भाषांमधीलही.
इंग्रजीचे आपल्याइतके स्तोम जगात अन्यत्र कुठेही नाही आणि माझ्या मुलांच्या मनात तर तो बागुलबुवा कधीच नव्हता. त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या मित्रमंडळीतही मला ही भीती, हा संकोच कधी जाणवला नाही. उलट त्यांनी इंग्रजी ही भाषा गृहीत न धरता आणि परकीही न मानता ती वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर जाणीवपूर्वक आपलीशी केली. त्यामुळे ते त्या भाषेचा मनोज्ञ वापर करतात. आज नीरद गीतकार आहे. तो इंग्रजीमध्ये व्यक्त होतो. पण ते शब्द जुळाऱ्यासारखे नव्हे. त्याला ते सुचतेच इंग्रजीमध्ये.
आपण ज्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक परिवेशात राहतो त्याचे आकलन करून घ्यायचे असेल, मुळे नीट रुजवायची असतील, खोलवर पुढे आकाशात उंच उंच वाढण्यासाठी.. तर ‘मातृभाषेतील शिक्षणच प्रभावी ठरणार आहे. इंग्रजीला विरोध म्हणून मातृभाषेत शिक्षण हा पवित्रा नाहीच माझा. पण ताणरहित, आपल्या गुजगोष्टी जाणणारे, घडवणारे, आनंददायी शिक्षण हे मातृभाषेतच होऊ शकते यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि मी ‘हे घडते’ याची स्वाभिमान साक्षीदार आहे.