मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी दैनंदिन मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात ८२ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४,१९२ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाणही घटू लागले असून गुरुवारी हे प्रमाण १०.७९ टक्के  झाले आहे.

मुंबईत गुरुवारी ४ हजार १९२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६ लाख ४४ हजार झाली आहे. एका दिवसात नव्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजे ५ हजार ६५० रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ५ लाख ६६ हजारांहून अधिक म्हणजेच ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती; मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दर ७९ टक्यांपर्यंत कमी झाला होता. आता हा दर वाढून ८८ टक्के झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. ही संख्या ९२ हजारांपुढे गेली होती. ती आता ६४ हजार ०१८ झाली आहे. त्यापैकी ७३ टक्के म्हणजेच ४७ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर २५ टक्के  म्हणजेच १६ हजारांहून अधिक रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १ हजार ४४२ झाली आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. दर दिवशी ४५ ते ५० हजार चाचण्या के ल्या जातात. मात्र चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी झाले आहे. बुधवारी ३८,८४८ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १०.७९ टक्के नागरिक बाधित आढळले. एकू ण चाचण्यांपैकी १४,७०० प्रतिजन चाचण्या होत्या. त्यापैकी ५ टक्के बाधित होते. तर २४,२०० आरटीपीसीआर चाचण्या होत्या. त्यातील १५ टक्के बाधित होते. आतापर्यंत ५३ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मृतांची संख्या १३ हजारांपुढे

मृतांची संख्या मात्र वाढत असून गुरुवारी ८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात ४३ पुरुष व ३९ महिलांचा समावेश आहे. ५१ मृतांचे वय ६० वर्षांवरील होते. तर ५७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. २८ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. ३ मृतांचे वय ४० वर्षांखालील होते. मृतांची एकूण संख्या १३ हजार ०७२ झाली आहे.

ठाणे जिल्ह््यात ३,३८४ रुग्ण

ठाणे जिल्ह््यात गुरुवारी ३,३८४ करोना रुग्ण आढळून आले. तर ६० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.    ठाणे महापालिका क्षेत्रात ८६३, कल्याण-डोंबिवली ८३५, नवी मुंबई ५०१, मीरा-भाईंदर ४४३, ठाणे ग्रमीण ३०८, बदलापूर १५२, उल्हासनगर १३१, अंबरनाथ १२५ आणि भिवंडीत २६ रुग्ण आढळून आले. ६० मृतांपैकी ठाणे १३, नवी मुंबई १२, कल्याण-डोंबिवली दहा, मीरा-भाईंदर नऊ, ठाणे ग्रामीण सहा, अंबरनाथ पाच, उल्हासनगर तीन आणि बदलापूरमधील दोन रुग्णांचा सामावेश आहे.