लोकलमध्ये प्रवेश नसल्याने प्रवाशांची धावपळ

मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा सोमवारपासून सुरू झाली असली तरी सर्व प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे सेवा खुली नसल्यामुळे प्रवाशांची धावपळच होत आहे. विशेषत: नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील प्रवाशांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून प्रवासाचा फार वेळ वाचत नसल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

राज्य सरकारच्या परवानगीनंतर मेट्रो सेवा सोमवारपासून सुरू झाली.  दूरच्या उपनगरातून, तसेच पनवेल, कल्याण-डोंबिवली येथून अनेक प्रवासी अंधेरी, चकाला, साकीनाका भागांत कामासाठी येत असतात. उपनगरी रेल्वेने प्रवास करता येत नसल्याने त्यांना दोन ते तीन वाहने बदलून घाटकोपर येथे मेट्रो स्थानकापर्यंत यावे लागते.

कळंबोलीहून चकाला येथे जाण्यासाठी बसने घाटकोपर (पूर्व) आगार गाठायचे. तेथून चकाला गाठण्यासाठी बस लवकर मिळत नाही. मेट्रो स्थानकापर्यंतच्या बससाठी पुन्हा एलबीएस मार्गावर चालत जावे लागते. बस मिळाली नाही तर रिक्षा करावी लागते, असे या मार्गावर नियमित प्रवास करणारे सुचित्रा साबळे यांनी सांगितले. घाटकोपर स्थानकाजवळ तसेच अन्य मेट्रो स्थानकांच्या परिसरात खासगी वाहन उभे करण्यासाठी पुरेशी आणि खात्रीशीर सुविधा नसल्याने खासगी वाहनाने मेट्रो स्थानक गाठण्याचा पर्यायही बाद ठरत असल्याचे डोंबिवली ते चकाला प्रवास करणारे अनिकेत काळे यांनी सांगितले.

उपनगरी रेल्वे ते मेट्रो प्रवासी

या मेट्रो मार्गावरील  स्थानकांतून दिवसाला दोन लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. त्यापैकी ८० टक्के  प्रवासी उपनगरी रेल्वेतून या स्थानकांवर येत असल्याचे ‘मेट्रो वन’च्या व्यवस्थापनाने सांगितले.