राज्याच्या विशेषत: अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) यांनी आराखडा तयार केला आहे. त्यातील पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. मुंबई ते पुणे अतिजलद मार्ग उभारून हे अंतर एक तासात पार करता येईल, असा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे.

सह्य़ाद्री अतिथीगृह येथे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल आदी बैठकीला उपस्थित होते.

पुणे आणि नाशिक दोन्ही जिल्हे कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात समृद्ध आणि पुढारलेले जिल्हे आहेत. हा रेल्वे मार्ग पुणे आणि नाशिक येथील औद्योगिक क्षेत्र आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारा असून भाविकांना शिर्डीला जाणेही सोयीचे होईल. रेल्वे मार्ग विकसित झाल्यास या भागातील आर्थिक उलाढाल वाढून महसूल वाढीबरोबरच या भागातील कृषी, पर्यटन, उद्योग वाढीस आणि कृषी- औद्योगिक उत्पादनाच्या वाहतूक व निर्यातीस मोठी मदत होईल. रोजगार निर्मितीस चालना मिळेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्याबाबतचे व इतर नियोजित प्रकल्पांबाबतचे सादरीकरण महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी केले. यामध्ये मुंबई-पुणे (हायस्पीड रेल्वे प्रकल्प १ तास प्रवास), रत्नागिरी-पुणे, औरंगाबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव, पुणे-औरंगाबाद, पुणे-नांदेड, चिपळूण – कराड (नवीन लाइन), वैभववाडी -कोल्हापूर (नवीन लाइन) या प्रकल्पांचा समावेश आहे.