गेल्या पाच दिवसांपासून ठप्प असलेली कसारा- टिटवाळा रेल्वे मार्गावरची वाहतूक अखेर सुरू झाली आहे. मध्य रेल्वेने शनिवारी दुपारपर्यंत ही वाहतूक सुरू होईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज सकाळीच ७.५५ मिनिटांनी आसनगावहून पहिली लोकल कसाऱ्याच्या दिशेने रवाना झाली. ही लोकल ८.३४ वाजता वासिंद येथे पोहचली. दुपारी २ वाजेपर्यंत कसारा मार्ग पूर्णपणे पूर्ववत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय, मध्य रेल्वेच्या पावसामुळे बिघडलेल्या ३५ लोकलही आजपासून पुन्हा रूळावर येणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे डबे आसनगाव- वाशिंददरम्यान रुळावरुन घसरले होते. ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुरांतो एक्स्प्रेसचे डबे हटवण्यात यश आले होते. मात्र या मार्गावरील तांत्रिक काम रखडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्पच होती. याचा परिणाम लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला होता. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं येणारी रेल्वेसेवाही ठप्प झाली होती. नाशिकवरुन सुटणाऱ्या ३० पेक्षा जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवारी वाशिंद येथे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेकही झाला होता. या प्रवाशांनी वाशिंद स्थानकात रेल रोको आंदोलन केले होते. काही प्रवाशांनी स्टेशन मॅनेजरचे कार्यालय गाठून लोकल सेवा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. यासाठी आणखी काही दिवस लागतील असे उत्तर मिळाल्याने प्रवाशी संतापले. संतप्त प्रवाशांनी रुळावरुन उतरून दादर- अमृतसर एक्स्प्रेस रोखून धरली. तातडीने लोकल सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईची पार दैना उडवली. रस्ते तुडुंब भरले आणि रेल्वे रूळही पाण्याखाली गेले. हे पाणी ओसरायला तब्बल २४ तास लागले. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मध्य रेल्वेवर साचलेले पाणी ओसरले आणि लोकल सेवा पूर्वपदावर येईल असे वाटत असतानाच सेवा कोलमडलेलीच होती. मंगळवारच्या पावसामुळे कुर्ला, सायन, माटुंगा आणि परेल स्थानकातील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले होते. सुमारे १२ ते १५ इंचापर्यंत पाणी या ठिकाणी साचले होते. त्यातून रेल्वे चालविणे मध्य रेल्वे प्रशासनाला शक्य नव्हते. लोकल पाण्यात तासनतास उभ्या राहिल्यामुळे तब्बल ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे या लोकलमधे बिघाड झाला. या लोकल नादुरुस्त झाल्याने रेल्वेसमोर आणखी एक मोठे संकट उभे राहिले होते.