दिवाळीनंतर निर्णयाची शक्यता

मुंबईकरांना प्रतिदिन होणारा ३८० कोटी लिटरचा पाणीपुरवठा आजही कायम आहे. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असल्याने महापालिका दिवाळीनंतर पाणीपुरवठय़ात कपात करण्याची शक्यता आहे.

मुंबईत महापालिका प्रशासनाने पाणीकपात केल्याचा आरोप सर्व राजकीय पक्षांचे नगरसेवक करीत आहेत. परंतु, पावसाळ्यात काही धरणे वाहत असल्याने त्यांतील अतिरिक्त पाणी मुंबईला पुरवण्यात येत होते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईला प्रतिदिन ३९५ कोटी लिटर पाणीपुरवठा केला जात होता. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरपासून प्रतिदिन होणाऱ्या पाणीपुरवठय़ापैकी अतिरिक्त १५ कोटी लिटर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना सध्या ३८० कोटी लिटर पाणीपुरवठा केला जात आहे.

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय यांतून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मुंबईची वर्षभराची तहान एक लाख ४० हजार कोटी लिटरची आहे. त्या तुलनेत सर्व जलाशयांमध्ये १९ ऑक्टोबपर्यंत एक लाख २३ हजार ३६२ कोटी लिटर एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत सर्व जलाशयांमध्ये एक लाख ४३ हजार ८०२ कोटी लिटर पाणीसाठा होता. यंदा २० हजार कोटी लिटर पाणीसाठा कमी आहे. याचाच अर्थ ५० ते ५२ दिवसांचा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणीकपात अपरिहार्य ठरू शकते, असे सूत्रांनी सांगितले. महापालिकेला ३१ जुलै २०१९पर्यंत पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

आढावा घेऊन पाणीबचत

  • मुंबईत दिवाळीनंतर पाणीकपात जाहीर होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • सध्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याची मागणी अधिक आहे. नोव्हेंबरपासून पाण्याच्या मागणीत थोडी घट होईल.
  • दिवाळीनंतर पाणी परिस्थितीचा आढावा घेऊन काही प्रमाणात पाणीकपात करून पाणीबचत केली जाईल.