देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडून करोनाशी सामना करण्याचे सर्वतोपरी प्रयत्नही सुरू आहेत. दरम्यान, मुंबईतील धारावी मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेनंही दखल घेतली असून त्यांच्याकडून धारावी मॉडेलची स्तुती करण्यात आली आहे. धारावीतील झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. तब्बल २.५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या भागात जवळपास ६.५ लाख लोकं वास्तव्य करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील या ‘धारावी मॉडेल’ची स्तुती केली आहे. “केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो,” असं टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस म्हणाले. “जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याची काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगिकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

WHO कडून स्तुती

“मुंबईतील धारावी परिसरात करोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळताना दिसत आहे. काही देशांमध्ये आता निर्बंध कमी करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता आवश्यक आहे,” असं गेब्रेयेसुस यांनी स्पष्ट केलं.

धारावीसारख्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी चिंता सर्वच स्तरातून व्यक्त करण्य़ात आली होती. काही जणांकडून सुरूवातीची संख्या पाहता धारावीचा वुहान असाही उल्लेख करण्यात आला होता. परंतु त्यानंतर प्रशासनानं त्वरित या ठिकाणी आयसोलेशनची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांसाठी आयसोलेशनची व्यवस्था केली. तसंच सामूहिक शौचालयाची समस्याही दूर करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्याही वाढवण्यात आल्या. त्यामुळे धारावीसारख्या परिसरातील रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आलं. जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावी मॉडेलची स्तुती होत असली तरी मुंबई आणि महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शुक्रवारी महाराष्ट्राता आतापर्यंतचे सर्वाधिक ७ हजार ८६२ नवे रुग्ण सापडले. तर २२६ रुग्णांचा मृत्यू झाला.