मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणांतील पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी महापालिकेने जाहीर केलेली १० टक्के पाणीकपात शनिवार, १ जुलैपासून लागू होणार आहे. दरम्यान, पावसाच्या संततधारेमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठय़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.
दमदार पावसामुळे सर्व धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. असे असताना मुंबईत १ जुलैपासून पाणीकपात लागू करण्यात येत आहे. धरणांमधील पाणीसाठा खालावल्यामुळे महापालिकेने १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जूनच्या शेवटच्या आठवडय़ात घेतला होता. चांगल्या पावसामुळे धरणांमधील सहा टक्क्यांपर्यंत खालावलेला पाणीसाठा शुक्रवारी १०.८८ टक्के झाला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत सध्या एक लाख ५७ हजार ४१२ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या चार दिवसांतील पावसामुळे पाणीसाठय़ात वाढ झाली असून गेल्या वर्षीपेक्षा पाणीसाठा वाढला आहे.